ग्वाल्हेर : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशात महिलांवरील अत्याचार व बलात्कारांचे, तसेच त्यांच्या अपहरणाचे प्रकार वाढत असतानाच, पोलीस महासंचालक व्ही. के. सिंग यांनी मात्र त्यास जणू काही महिलाच जबाबदार असल्याचे सूचित केले आहे गेल्या आठवड्यात एक आठ वर्षांची मुलगी संध्याकाळी दुकानात काही वस्तू आणायला गेली होती. ती बराच वेळ न परतल्याने घरच्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी तिचा शोध सुरू केला असता घरापासून काही अंतरावर तिचा मृतदेह आढळला. पोस्टमॉर्टेममध्ये तिचा गळा दाबून खून करण्यात आला आणि त्याआधी तिच्यावर बलात्कारही झाला होता, असे दिसून आले.
या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक सिंग यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले असता, ते म्हणाले की, हल्ली मुली शाळा-कॉलेजात जाऊ लागल्या आहेत. अधिक स्वतंत्र झाल्या आहेत. त्या अनेकदा एकट्याने बाहेर पडतात. त्या मुलांशी, तरुणांशी बोलतात. त्यातून असे प्रकार घडतात. अनेकदा मुली स्वत:हून घरातून निघून जातात आणि पालक मात्र मुलीच्या अपहरणाची तक्रार नोंदवतात. हा नवा ट्रेंड आम्हाला दिसून आला आहे. मुलींवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांविषयी स्पष्ट न बोलता, त्यांनी त्याचा दोष मुलींवरच ढकलल्याने राज्यात संतापाची लाट उसळली आहे.
मुलींच्या अपहरणाची प्रकरणे बनावट असतात, असेच त्यांनी सूचित केले आहे. त्यामुळे पोलीस महासंचालक दर्जाचा अधिकारी असे कसे बोलू शकतो, असा सवाल विचारला जात आहे. मुलींनी शिकू नये, घराबाहेर पडू नये, असे पोलीस महासंचालकांचे म्हणणे आहे की काय, असा प्रश्नही महिला, मुली तसेच पुरुषही विचारत आहेत. भाजप व काँग्रेस यांनी पोलीस महासंचालकांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. मध्यप्रदेशात अपहरणाचे ७२३७ गुन्हे २0१६ मध्ये नोंदविण्यात आले होते. त्यात मुलींच्या अपहरणाचे प्रमाण ६९ टक्के होते. राष्ट्रीय गुन्हे नोंद मंडळानेही अपहरणाचे इतके प्रकार झाल्याचे मान्य केले आहे. गुन्हेगारीमध्ये दिल्लीनंतर मध्यप्रदेशचाच क्रमांक लागतो. बलात्काराचे गुन्हेही राज्यात अधिक होत असल्याचा अहवाल आहे.