अलवर : बहुजननामा ऑनलाइन – राजस्थानमधील काँग्रेस सरकारने मॉब लिंचींगमध्ये (जमावाच्या हल्यात) मृत्यूमुखी पडलेल्या पहलू खान याच्या विरोधात गो तस्करीचा गुन्हा दाखल केला आहे.
दोन वर्षापुर्वी राजस्थानमधील असवर येथील जमावाने गो तस्करीच्या संशयावरुन पहलू खान याच्यावर हल्ला करुन त्याला मारहाण केली होती. मारहाणीत पहलू खान गंभीर जखमी झाला होता. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला होता.
या मॉब लिंचीगच्या घटनेमुळे तत्कालीन भाजप सरकारवर मोठी टिका करण्यात आली होती. सामाजिक संघटनांनी भाजप सरकार विरुद्ध आंदोलन देखील केले होते. आता मात्र या घटनेला वेगळेच वळण मिळाले आहे. राजस्थान पोलिसांनी पहलू खानविरोधात राजस्थानच्या गोजातीय पशु (वध निषेध आणि अस्थायी प्रवास किंवा निर्यातीवर प्रतिबंध) अधिनयम, १९९५ आणि नियम १९९५ च्या कलम ५, ८ आणि ९ अंतर्गत आरोपपत्र दाखल केले आहे.
दरम्यान एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना भाजप नेते ज्ञानदेव यांनी पहलू खान, त्याचा भाऊ आणि मुले हे सराईत गुन्हेगार होते, असा आरोप केला आहे. तर पहलू खान यांचा मोठा मुलगा इरशाद याने इंडीयन एक्सप्रेस या इंग्रजी वर्तमानपत्राशी बोलताना म्हटले आहे की, दोन वर्षापुर्वी आम्ही आमच्या वडीलांना गमावले. भाजप सरकाराने त्यावेळी आमच्या वडीलांविरोधातच गुन्हा दाखल केला होता. काँग्रेस सरकार याची सखोल चौकशी करुन गुन्हा मागे घेईल असे आम्हाला वाटत होते. मात्र काँग्रेसने देखील त्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केली आहे. भाजप सरकार बदलल्या नंतर न्याय मिळेल अशी अपेक्षा केली होती. मात्र ती आता फोल ठरली आहे.