नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने गरीबांसाठी दिलासा देणारे निर्णय घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत गरीबाला पुढील तीन महिने प्रत्येकी 5 किलो, तांदूळ किंवा गहू मोफत दिला जाणार आहे. त्यासोबतच एक किलो डाळही दिली जाणार आहे. अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन घोषित केल्यानंतर त्याचा फटका मोठ्या प्रमाणवर गरीब, मजूर, आणि इतर घटकांना बसणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कोरोना संकटाला तोंड देण्यासाठी 1.70 लाख कोटींचे पॅकेजही जाहिर केले असून या योजनेतच गरीब वर्गाला मात्र मोठा दिलासा दिला आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत लाभार्थींना आधीच 5 किलो गहू किंवा तांदूळ दिला जात होता. त्यात आता पुढील तीन महिन्यांसाठी प्रत्येकी मोफत गहू किंवा तांदूळ दिला जाणार आहे. त्यासोबतच 1 किलो डाळही मोफत दिली जाणार आहे. या योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेखालील गरीबांना होणार आहे.