जोधपूर : वृत्तसंस्था – देशात २५ मार्च पासून लॉकडाऊन असल्याने जोधपूर येथील एक डॉक्टर आपल्या होणाऱ्या पत्नीला भेटण्यासाठी बिकानेर जिल्ह्यात गेल्यावर तेथेच अडकले. लॉकडाऊन पुढे वाढताच कुटुंबाला जावई लग्न न करता किती दिवस घरात राहणार याची चिंता होऊ लागली. ३० दिवस लग्न न करता सासरी राहिल्यानंतर दोघांचे लग्न झाले.
या अजब विवाहाची सर्वत्र चर्चा होत आहे. जोधपूरचे रहिवासी आणि अहमदाबाद येथे काम करणारे विवेक मेहता यांनी व्यवसायाने फॅशन डिझायनर असलेल्या बीकानेरच्या पूजा चोप्राशी लग्न केले.
२१ मार्च रोजी विवेक आपली होणारी पत्नी पूजाला भेटण्यासाठी बीकानेरच्या गंगाशहरला पोहोचला होता. दुसर्या दिवशी ट्रेन्स बंद झाल्या. २२ मार्चपासून राजस्थानमध्ये लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे तो पुन्हा अहमदाबादला जाऊ शकला नाही, म्हणून त्याला सासरी राहावे लागले.
जेव्हा दुसऱ्यांदा १५ एप्रिल ते ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढले तेव्हा पूजाच्या वडिलांनी बीकानेरमधील गंगाशहरच्या जैन समाजाच्या अध्यक्षांना आपली अडचण सांगितली, पण डॉ. विवेक यांचे कुटुंब लॉकडाऊनमुळे अहमदाबादहून येथे येऊ शकणार नव्हते. तसेच या लॉकडाऊन दरम्यान कोर्ट मॅरेज करणेही शक्य नव्हते.
दुसरीकडे विवेकनेसुद्धा विचार केला की तो किती दिवस सासरी राहणार, परिस्थिती अवघड बनली आहे. अखेर दोन्ही कुटुंबांच्या सहमतीने सासरी ३० दिवस राहिल्यानंतर सोमवारी डॉ. विवेक आणि पूजा विवाह बंधनात अडकले.
विवेकचे पालक, भाऊ व बहिण कोणीही लग्नाला येऊ शकले नाहीत. वधूच्या कुटुंबाच्या उपस्थितीत लग्न झाले. लॉकडाऊनमुळे डॉ. विवेक यांच्या कुटुंबीय आणि मित्रांनी व्हिडिओ कॉलवरून हे लग्न पाहिले. पूजाने व्हिडिओ कॉलद्वारे सासू – सासऱ्यांचे आशीर्वादही घेतले.
विवेकने सांगितले की लग्नापूर्वी आमच्या घरी प्री वेडिंग शूटदेखील झाले. जेव्हा लॉकडाऊन संपेल, तेव्हा पूजा तिच्या सासरी जाईल. सध्या डॉ. विवेक आणि पूजा दोघेही बीकानेरच्या गंगाशहरमध्ये आहेत.