मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – अणुशक्ती नगर, चेंबूर, धारावी, सायन-कोळीवाडा, वडाळा, माहिम या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश असणारा दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ हा प्रत्येक उमेदवाराची दमछाक करणारा मतदारसंघ आहे. पंजाबी-सिंधी, धारावी व माटुंगा परिसरातील दक्षिण भारतीयांची वस्ती, दादर- प्रभादेवी – बीडीडी चाळीतील मराठी पट्टा, या साऱ्यात मिळेल तिथे विसावलेला उत्तर भारतीय समाज मोठ्या प्रमाणात आहे. अशी या मतदारसंघाची ओळख आहे.
२०१४ च्या निवडणुकीत या मतदारसंघातून युतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी काँग्रेसचे खासदार एकनाथ गायकवाड यांचा १ लाख ३८ हजार मतांच्या आघाडीने पराभव केला होता. महापालिका नगरसेवक, स्थायी समितीच्या अध्यक्ष पदाचा अनुभव, शिवसेनेची संघटनात्मक जाळे आणि मोदीची लाट ह्या गोष्टी राहुल शेवाळे यांच्यासाठी जमेच्या ठरल्या.
काँग्रेसमध्ये माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्यासह भालचंद्र मुणगेकर, राजन भोसले, यांची नावे चर्चेत आहेत. गायकवाड यांच्या कन्या आमदार वर्षा गायकवाड यांच्याही नावाची काही काळ चर्चा होती. माजी कुलगुरू, राज्यसभेचे खासदार राहिलेले मुणगेकर एक अभ्यासू, उच्चशिक्षित दलित चेहरा म्हणून पक्षासाठी उपयोगी ठरू शकतात, असा तर्क दिला जात आहे. परंतु धारावी आणि दलित वस्त्यांमध्ये असलेला थेट संपर्क एकनाथ गायकवाड यांच्यासाठी जमेची बाजू आहे. याच जोरावर मनोहर जोशींचा पराभव करत ते जायंट किलर ठरले होते. खासदार म्हणून धारावी आणि दलित पट्याबाहेर संपर्क वाढविण्याचे त्यांच्याकडून फारसे प्रयत्न झाले नाहीत. काँग्रेससमोर सध्या गायकवाड की मुणगेकर हा तिढा कायम आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही या मतदारसंघावर दावा केला आहे. शिवसेनेने मोठ्या मनाने ही जागा आरपीआयसाठी सोडावी, असे सांगत कार्यकर्त्यांचे मेळावेही आठवले यांनी घेतले. या मतदारसंघात जनसंपर्क कार्यालयेही उघडली आहेत. ह्याच मतदारसंघात शिवसेना भवन, शिवाजी पार्क, महापौर निवास, आताचे बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक, सिद्धीविनायक मंदिर, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक अशा शिवसेनेला भावनिकदृष्टया जवळच्या वाटणाऱ्या वास्तू मतदारसंघात आहेत. शिवसेना हा मतदारसंघ सोडण्याची शक्यता नाही. भाजपची स्थानिक पातळीवर ताकद वाढली असली तरी भाजपाकडे खासदारकीसाठी उमेदवार नाही. युती झालीच नाही तर भाजपा आठवलेंसाठी ही जागा सोडण्याची शक्यता अधिक आहे.