बहुजननामा : ऑनलाईन टीम – महाराष्ट्राच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे कोरोनामुळे निधन झाले. संसर्गामुळे काही दिवसांपुर्वी त्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.उपचारादरम्यान प्रकृती बिघडल्याने पहाटे चार वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. निवृत्त सनदी अधिकारी आणि महाराष्ट्राच्या पहिल्या स्त्री निवडणूक आयुक्त म्हणून नीला सत्यनारायण यांची ओळख होती. नीला सत्यनारायण 1972 आयएएस बॅचच्या सनदी अधिकारी होत्या.
नीला सत्यनारायण यांची लोकप्रिय सनदी अधिकारी म्हणून त्यांची ओळख तर होती. रुक्ष आणि अतिशय धकाधकीच्या कामात व्यग्र असतानाही त्यांनी आपली संवेदनशीलता जोपासली होती. लेखनातून त्या नेहमी व्यक्त होत राहिल्या. कवयित्री म्हणून त्या अधिक परिचित असल्या, तरी त्यांचे स्तंभलेखनही अनेकांना आवडत होते. नीला सत्यनारायण यांनी हिंदी, मराठी, इंग्रजी या तिन्ही भाषांमधून पुस्तके लिहिली. याशिवाय 150 हून अधिक कविता लिहिल्या. त्यांच्या काही पुस्तकांवर चित्रपटदेखील तयार करण्यात आले.
याशिवाय त्यांनी काही मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन केले होते. नीला सत्यनारायण यांनी सनदी अधिकारपदाच्या 37 वर्षांच्या कारकिर्दीत मुलकी खाते, गृहखाते, वनविभाग, माहिती आणि प्रसिद्धी, वैद्यक आणि समाजकल्याण, ग्रामीण विकास यासारख्या अनेक खात्यांत सनदी अधिकारी म्हणून काम केले. त्यांना लहानपणापासूनच रंगमंचावर काम करण्याची इच्छा होती. मात्र, आयएसआय होण्यासाठीचे बळ पतीने दिल्याचे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.