राजगुरुनगर : बहुजननामा ऑनलाईन – खेड पंचायत समितीच्या सभापतीं विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आल्यानंतर सभापतींना सदस्यांवर केलेला गोळीबार, प्राणघातक हल्ला, विनयभंग हा सर्व प्रकार आमदार दिलीप मोहिते यांनी रचलेले कुंभाड आहे, असा आरोप माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील(Adhalrao Patil) यांनी केला आहे. मोहिते हे राजकारणातील ब्लॅकमेकर्स आहेत. सत्तेचा दुरुपयोग करणाऱ्या या आमदाराला त्यांच्या पक्षातही किंमत नाही, असा टोलाही आढळराव यांनी लगावला. तसेच ज्यांच्यावर आजपर्यंत विनयभंग व खुनाचे गुन्हे दाखल आहेत अशा लोकांनी हा वाद वाढवण्याचे काम केल्याचा आरोप आढळराव पाटील(Adhalrao Patil) यांनी केला आहे.
गुरुवारी पहाटे खडकवासला येथील एका रिसॉर्टमध्ये थांबलेल्या खेड पंचायत समितीच्या सदस्यांना सभापतींनी गुंडाच्या मदतीने जबर मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. या सर्व प्रकरणाला आढळराव पाटील जबाबदार असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी आमदार मोहिते यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि.28) आढळराव पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका मांडली.
पोखरकर सदस्यांना सोडवण्यासाठी गेले होते
शिवसेनेच्या काही सदस्यांना आमदारांनी त्यांच्या रिसॉर्टमध्ये बळजबरीने ठेवले होते. सभापती भगवान पोखरकर तेथे या सदस्यांना सोडविण्यास गेले होते. त्या वेळी तेथे फक्त झटापट झाली. मात्र, काहींनी हा प्रकार रंगवला. पोलिस ठाण्यात खोटी फिर्याद देण्यात आली. ही फिर्याद शिवसेना सदस्यांची नसून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्याची आहे. एकमेकांच्या सदस्य फोडायचे नाही, असे आघाडीचे ठरले असताना शिवसेनेचे सदस्य आमदारांनी रिसॉर्टवर नेले कसे, हा प्रश्न आहे. याबाबत शिवसेनेचे अनिल देसाई यांनी राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली आहे, असे आढळराव यांनी सांगितले.
माझ्यावर गुन्हा दाखल करावाच
या प्रकरणाचा सूत्रधार मी असून, माझ्यावर गुन्हा दाखल करा, असा आमदार मोहिते यांचा आरोप म्हणजे बालिशपणा आहे, असा थिल्लरपणा मी करीत नाही. पंधार वर्षे मला मतदारसंघातील जनता ओळखत आहे. उलट खंडण्या, विनयभंग, खून, गुंडगिरी आमदारांच्या नसानसात भरली आहे. त्यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल करावाच, असे त्यांनी जाहीर आव्हान दिले आहे. पंचायत समितीच्या इमारतीच्या बांधकामाची जागा बदलण्यासाठी सभापती पोखरकर आमदारांना भीक घालत नव्हते. म्हणून पंचायत समिती ताब्यात घेण्यासाठी त्यांनी हा बनाव केला. अविश्वास ठरावाच्या दिवशी पक्षाचा व्हीप काढणार आहे. त्यामुळे सदस्यांवर कारवाई करण्याचा प्रश्न येणार नाही, असेही आढळराव पाटील म्हणाले.
आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
कोरोना काळात सर्व हॉटेल बंद असताना आमदार दिलीप मोहिते यांच्या रिसॉर्टवर सदस्य, 30 ते 35 गुंड, स्टाफ मुक्कामी कसे होते. बेकायदा हॉटेल चालू ठवल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असल्याची माहिती, आढळराव पाटील यांनी दिली.