गांधीनगर : वृत्तसंस्था – गुजरातचे (gujarat) 4 वेळा मुख्यमंत्री आणि माजी परराष्ट्र मंत्री, ज्येष्ठ काँग्रेस नेते माधवसिंह सोलंकी (madhavsinh solanki ) यांचे शनिवारी निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. माजी मंत्री आणि काँग्रेस नेते भरत सोलंकी यांचे ते वडिल आहेत. पेशाने वकील असलेले सोलंकी (madhavsinh solanki ) 1977 मध्ये पहिल्यांदा खुप कमी वेळासाठी राज्याचे मुख्यमंत्री बनले होते. सोलंकी 1980 मध्ये सत्तेत आले होते. नरसिंह राव सरकारमध्ये सोलंकी परराष्ट्र मंत्री होते.
सोलंकी सत्तेत येण्याची कथा सुद्धा वेगळी आहे. त्यांनी आपला केएचएएम फॉर्म्युला म्हणजे क्षत्रिय, हरिजन, आदिवासी, मुस्लिम यांच्या द्वारे ताकद मिळवली होती. त्यांनी 1980 च्या निवडणुकी अगोदर केएचएएम आघाडीचा पाया रचला होता. याचा प्रभाव इतका झाला की, निवडणुकीत पटेल, ब्राह्मण आणि बनिया यांच्या हातातील ताकद ओबीसी, दलित आणि आदिवासींच्या हातात आली.
केएचएएम राजकारणाची ताकद पाहून पटेल समजाने भाजपाला वाढवण्याचा निर्णय घेतला होता. सोलंकी यांच्या या आघाडीला जाती आधारित आघाडीचे युग मानले जाते. असे म्हटले जाते की, येथूनच जाती आधारावर राजकीय पक्ष एकत्र येण्यास सुरूवात झाली. 1981 मध्ये पटेल यांच्या नेतृत्वातील उच्च जातींनी सरकार आणि ओबीसी आरक्षणाविरोधात दोन महिने आंदोलन केले होते.
मात्र, या आंदोलनात तेव्हा पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सोलंकी यांचे समर्थन केले होते. सोलंकी यांनी म्हटले होते की, जेव्हा हरिजनांवर गुजरातमध्ये हल्ला झाला होता, तेव्हा मला इंदिरा गांधींनी याबाबत विचारले होते. त्यांनी या प्रकरणात माझे सर्व ऐकून घेतले आणि म्हटले की, हे आंदोलन योग्य नाही. तुम्ही यांच्यापुढे झकु नका. त्यांनी दावा केला होता की, त्यावेळी इंदिरा गांधींनी त्यांना खुप मदत केली होती आणि शेजारी राज्यांतून विशेष पोलीस बळ पाठवले होते.