मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – आयुष्यभर कामगारांसाठी झटलेला नेता, बंदसम्राट आणि माजी सरंक्षणमंत्री जॉर्ज फर्नाडिस यांचे मंगळवारी दीर्घ आजाराने दिल्लीतील रुग्णालयात निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. जॉर्ज फर्नाडिस यांच्या निधनाने कामगारांसाठी झुंजणारा एक अवलिया काळाच्या पडद्याआड गेला. कामगार नेता ते सरंक्षणमंत्री अशी प्रदीर्घ कारकिर्द असलेल्या जॉर्ज फर्नाडिस यांच्या राजकीय जीवनात अनेक चढउतार आले. त्यांची काही प्रसंग सर्वांच्याच लक्षात राहतील असे आहेत.
संसदेत अनवाणी आलेला खासदार
जॉर्ज फर्नाडिस यांच्या अनेक आश्चर्य वाटेल अशा गोष्टी केल्या़ डाव्या विचारसरणीचे नेते असलेल्या जॉर्ज फर्नाडिस यांना आणीबाणीत बॉम्बस्फोटाच्या आरोपातून अटक करण्यात आली होती. अन्य राजकीय नेत्यांची इंदिरा गांधी यांनी सुटका केली तरी जॉर्ज फर्नाडिस यांची सुटका करण्यात आली नव्हती. त्यांनी तुरुंगातून निवडणूक लढविली व ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. जनता सरकार सत्तेवर येत असताना त्यांची तुरुंगातून सुटका झाली. ते तुरुंगातून थेट पोहचले ते संसदेत. त्यावेळी त्यांच्या पायात चप्पलही नव्हती. अनवाणी आलेला खासदार म्हणून त्यांचे अजूनही नाव घेतले जाते.
स. का. पाटीलला तुम्ही हरवू शकता
१९६० ते ७० च्या दशकात जॉर्ज फर्नाडिस हे मुंबईतील कामगार चळवळीत काम करीत होते. मुंबईत कॉंग्रेसला हरविणे अशक्य आहे, अशी परिस्थिती होती़ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स. का. पाटील हे तेव्हा राजकारणातील बडे प्रस्थ होते. ते १९६७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभे होते. त्यांच्याविरोधात विरोधी आघाडीतर्फे जॉर्ज फर्नाडिस यांना तिकीट देण्यात आले होते. यावेळी सर्वांचाच सूर असा होता की, काँग्रेसची सर्व आर्थिक रसद स. का. पाटील पुरवत होते. स. का. पाटील यांना हरविणे शक्य नाही, अशी सर्वांची समजूत होती. यावेळी जॉर्ज फर्नाडिस यांनी एक पोस्टर तयार केले. त्यावर त्यांनी लिहिले होते स. का. पाटीलांना तुम्ही हरवू शकता.
या एका ओळीचे पोस्टर संपूर्ण मतदारसंघात लावण्यात आले. लोकांना जॉर्ज यांचा हा प्रचार भावला व काँग्रेस आणि स. का. पराभूत होऊ शकतात, असा विश्वास या एका पोस्टरने मतदारांमध्ये निर्माण केला. त्यात स. का. पाटील यांचा दणदणीत पराभव करुन जॉर्ज फर्नाडिस यांनी आपल्या संसदीय कार्याला प्रारंभ केला.
समाजवादी विचारसरणीचा नेता अखेर उजव्यांच्या कळपात
जॉर्ज फर्नाडिस हे कामगार चळवळीतून पुढे आलेले नेतृत्व. समाजवादी विचारसरणीचे नेते राम मनोहर लोहिया यांचे शिष्य़ त्यांच्या विचाराचा आचरणाचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. असे असताना ते उजव्या आणि भाजपच्या कळपात कसे गेले असा प्रश्न त्यावेळी नेहमी विचारला जायचा. ती डाव्या व समाजवादी विचाराच्या नेत्यांनी त्यांची कोंडी केल्यानेच त्यांनी शेवटी आपल्या राजकीय अस्तित्वासाठी वाजपेयी यांना साथ देण्याचा निर्णय घेतला.
१९९४ साली लालुप्रसाद यादव यांच्याशी मतभेद झाल्यावर त्यांनी रवी रे आणि नितिश कुमार यांच्यासारख्यांना बरोबर घेऊन समता पक्षाची स्थापना केली. सर्व बाजूने त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केल्यामुळेच त्यांनी शेवटी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला. १९९६च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपशी युती केली.
अटलबिहारी वाजपेयी यांनीही त्यांच्या कार्याचा आब राखून त्यांना एनडीएचे समन्वयक म्हणून जबाबदारी सोपविली. त्यातूनच देशभरातील अनेक छोटे छोटे पक्ष एनडीएचे घटक पक्ष बनले व १९९९ साली एनडीएचे सरकार केंद्रस्थानी आले.
कारगील युद्धात महत्वाचा वाटा
मराठीसह अनेक भाषा बोलणारे जॉर्ज फर्नाडिस हे तब्बल ९ वेळा लोकसभेवर निवडून आले होते. कारगील युद्धाचे सर्व श्रेय भाजप व वाजपेयी यांना दिले गेले. त्यावेळी जॉर्ज फर्नाडिस हे सरंक्षणमंत्री होते. या युद्धातील विजयात त्यांचाही महत्वाचा वाटा होता. मात्र, त्याचे श्रेय त्यांना दिले गेले नाही. त्यांनीही कधी श्रेयाचे राजकारण केले नाही. मात्र, शवपेटिका गैरव्यवहाराचा ठपका त्यांच्यावर लावण्याचा प्रयत्न केला गेला.
कोकण रेल्वेचे शिल्पकार
१९७७ साली जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यावर मधु दंडवते हे रेल्वे मंत्री झाले तर जॉर्ज फर्नाडिस हे उद्योगमंत्री होते. कोकण रेल्वेच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी दंडवते यांना नेहमी साथ दिली. त्यानंतर १९८९ मध्ये जेव्हा पुन्हा जनता दलाचे सरकार केंद्रस्थानी आले. त्यावेळी व्ही़ पी़ सिंग यांच्या मंत्रीमंडळात ते रेल्वे मंत्री होते. त्यांनी व नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मधू दंडवते यांनी एकत्रितपणे कोकण रेल्वेचा प्रस्ताव आणला. त्यासाठी स्वतंत्र कंपनी स्थापन केले. त्यावेळी अनेकांनी इतक्या अवघड डोंगरदऱ्यातून रेल्वे बांधणी करता येईल का म्हणून आक्षेप घेतले. पण जॉर्ज मागे हटले नाही. त्यांनी पाच वर्षात कोकण रेल्वेचा प्रकल्प पूर्ण करुन दाखविला. पण हे मी केले, हे मी केले म्हणून कधीही टिमकी वाजविली नाही. आज कोकण रेल्वेच्या या शिल्पकाराचे कोणी नाव घेत नाही.