मुंबई बहुजननामा ऑनलाईन – राज्यातील पूरस्थितीमुळे वैद्यकिय प्रवेश प्रक्रियेच्या प्रवेश निश्चितीची मुदत पुढे ढकलण्यात आली आहे. तर विद्यार्थी नजीकच्या वैद्यकिय महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करू शकणार आहेत विद्यार्थ्यांनी राज्याच्या सीईटी सेलला इमेलद्वारे मागणी केली होती. राज्यातील ज्या भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्या भागात एमबीबीएस आणि बीडीएसच्या प्रवेशासाठी दुसऱ्या फेरीत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना १२ ऑगस्टपर्यंत मिळालेला प्रवेश निश्चित करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
बीएएमएस, बीएचएमएस, बीयुएमएस या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पहिल्या फेरीत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना १२ ऑगस्ट सायंकाळी पाचपर्यंत प्रवेश निश्चित करण्याची वाढवून देण्यात आली आहे. त्यांना मिळालेल्या महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करण्याची गरज नाही. तर विद्यार्थी संकेतस्थळावर दिलेल्या नजीकच्या वैद्यकिय महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करू शकणार आहेत. असे परिपत्रक सीईटी सेलने काढले आहे.
राज्यातील पूरस्थिती पाहता एमपीएससीचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. रविवारी ११ ऑगस्ट रोजी ही परीक्षा घेण्यात येणार होती. ती आता २४ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली व राज्यातील इतर जिल्ह्यातील पूरस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांनी ही मागणी केली होती. ती मान्य करत लोकसेवा आयोगाने पेपर पुढे ढकलेले आहे. लवकरच नवे प्रवेश पत्र संकेतस्थळावर अपलोड करण्यात येणार आहे.