सांगली : बहुजननामा ऑनलाईन – नातेवाईकांच्या अत्यंविधी कार्यक्रमाला जाताना वॅगनार कारचे स्टेरिंग अचानक लॉक झाल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळून त्यात ५ जणांचा बुडुन मृत्यु झाला. आटपाडी तालुक्यातील झरे पारेकरवाडी रोडवर रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
मच्छिंद्र पाटील (वय ६०), कुंडलीक बरकडे (वय ६०), गुंडा डोंबाळे (वय ३५), संगीता पाटील (वय ४०), शोभा पाटील (वय ३८) अशी मृत्यु झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील पारेकरवाडी येथून सातारा जिल्ह्यातील चितळी येथील नातेवाईकांच्या अंत्यविधी कार्यक्रमाला ६ जण निघाले होते. वाटेत गाडीचे स्टेअरिंग लॉक झाले. त्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी थेट रस्त्यालगतच्या विहिरीमध्ये जाऊन पडली. विहीर पाण्याने भरलेली असल्याने गाडीत असलेल्यांना बाहेर पडणे शक्य झाले नाही. गाडीतच पाच जणांचा मृत्यु झाला.
हरिबा वाघमोरे हे गाडीची काच फोडून बाहेर आल्याने बचावले. पोलिसांना या अपघाताची माहिती मिळताच पारेकरवाडी व झरे परिसरातील लोकांनी मदतीसाठी धाव घेतली. जेसीबीच्या सहाय्याने गाडी बाहेर काढण्यात आली. त्यात पाच जणांचे आत मृतदेह होते.