जयपूर : वृत्तसंस्था – राजस्थानमधील गुर्जर समाजाने छेडलेल्या आंदोलनाला हिसंक वळण लागले आहे. शासकीय नोकऱ्या आणि अन्य सरकारी सेवांमध्ये गुर्जर समाजाला पाच टक्के आरक्षण लागू करावे या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या गुर्जर समाज आंदोलकांवर आज गोळीबार करण्यात आला. पण त्यात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. गुर्जर लोकांकडून जाळपोळ तसेच पोलिसांवर दगडफेक करण्यात आली तीन गाड्या जाळण्यात आल्या. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला पण कुठलीही जीवितहानी झाली नाही.
या समाजाच्या आंदोलनाचा आजचा हा तिसरा दिवस आहे. आंदोलकांनी धोलपुर-ग्वाल्हेर महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला त्यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी हा गोळीबार करण्यात आला. पण आंदोलकांनी त्याला न जुमानता हा महामार्ग काही काळ रोखून धरला होता.
राजस्थानच्या सवाई माधवपुर जिल्ह्यात या समाजाचे नेते किरोरीसिंह बैंसला हे आपल्या समर्थकासह रेल्वे मार्गावर ठिय्या आंदोलन करीत आहेत. गेल्या शुकवार पासून त्यांनी तेथे ठिय्या मांडला आहे. दिल्ली- जयपुर, जोधपुर-भिलवाडा हे महामार्गही आंदोलकांनी काल काहीं काळ रोखून धरले होते.