बहुजननामा ऑनलाईन – पावसाने फिरवलेली पाठ, जळून जाणारी पिके आणि सततचा दुष्काळ…. असेच काहीसे चित्र पाथर्डी तालुक्याचे. जून महिन्याच्या सुरवातीला जो पाऊस झाला. त्यावर कपाशी, बाजरी, मका आदी पिकांची पेरणी केली. त्यानंतर पावसाने जी पाठ फिरविली. ती अजूनही कायम आहे. पुरेशा पावसाअभावी पिके जळून जात आहेत. मात्र तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती हटविण्यासाठी सरकारने केलेला कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी झाला आणि पाऊस पडला.
सरकारने पाथर्डी तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती हटविण्यासाठी विमानांनी रसायनाची फवारणी केली. त्यानंतर तालुक्यातील पूर्व दक्षिण भागात जोरदार पाऊस पडला. जूनच्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केलेली पिके जळून जाण्याच्या मार्गावर होती. त्यामुळे शासनाने कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी औरंगाबाद विमानतळावरुन तालुक्यात पहिल्यांदाच कृत्रिम पावसाचा प्रयोग केला. बुधवारी (ता. २१) शहरावर जमा झालेल्या पावसाच्या ढगांवर एक तास विमानातून रसायनांची फवारणी करण्यात आली. पण वाऱ्याचा वेग जास्त असल्याने फवारणी केले ढग पुर्व बाजूला सरकले.
त्यामुळे करोडी, तिनखडी, मोहटा, कोरडगाव, भिलवडी, मोहजदेवढे, पिंपळगाव, टाकळीमानुर तसेच बीड जिल्ह्यातील शिरूरपर्यंत जोरदार पाऊस झाला. हा प्रयोग यशस्वी झाल्याने येत्या काळात अशा स्वरूपाचा प्रयोग पाथर्डी तालुक्यातील दुष्काळ हटवण्यासाठी राबविण्यात यावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला ९ ऑगस्ट पासून सुरवात झाली. या प्रयोगाला मिळणारे यश पाहता दुष्काळाची परिस्थिती संपणार नसली तरी बारा महिने दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मराठवाड्याला आता कृत्रिम पावसाच्या आशेचा किरण दिसू लागला आहे.