बहुजननामा ऑनलाईन टीम
माध्यमिक शाळांतील पाचवीचे वर्ग प्राथमिक शाळांना टप्प्याटप्प्याने जोडण्याचा, शिक्षकांचे समायोजन करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. मात्र, वर्गाचे समायोजन करताना नवीन पद निर्माण करू नये असे स्पष्ट करण्यात आले आहे. नवीन वर्गखोली बांधावी लागल्यास त्याचा आर्थिक भार शिक्षण संस्थांवर टाकला आहे.
खासगी अनुदानित माध्यमिक शाळेतील पाचवीच्या वर्गावरील कार्यरत शिक्षकाचे प्राधान्याने त्याच संस्थेअंतर्गत सुरू असलेल्या इतर अनुदानित शाळेत समायोजन करावे. त्याच संस्थेत समायोजन शक्य नसल्यास दुसरा प्राधान्यक्रम म्हणून अन्य खासगी अनुदानित संस्थेत समायोजन करावे. त्या पद्धतीनेही समायोजन न झाल्यास तृतीय प्राधान्यक्रम म्हणून स्थानिक, नागरी स्वराज्य संस्थेच्या शाळेत समायोजन करावे. मात्र अंशत: अनुदानित शाळेतून पूर्णत: अनुदानित किंवा वाढीव टप्प्यावर अनुदानित शाळेत किंवा नागरी, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत समायोजन करू नये. जेणेकरून शासनावर आर्थिक बोजा वाढणार नाही, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.