मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना दिले होते. राज्यात शिवसेना सत्तेत आली आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याची धुरा सांभाळली. मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ केले. शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. तर दुसरी यादी 28 फेब्रुवारीला जाहीर करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.
महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर सरकारच पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. त्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. येत्या तीन महिन्यांमध्ये ही कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करणार आहे. पहिल्या सरकारची कर्जमाफीची योजना अजूनही सुरु आहे. त्यामुळे सर्व गोष्टी पूर्ण करूनच पुढे जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
दोन लाख रुपयापर्यंतचं कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असून उद्या पहिली यादी जाहीर करणार आहे. 35 लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्याची यादी तयार केली असून टप्प्यापटप्याने कर्जमाफीची अंमलबजावणी करणार आहे. तसेच गिरणी कामगारांच्या घराची लॉटरी येत्या 1 मार्चला निघणार आहे. सरकारच्या योजना उघड्या डोळ्यांनी बघाव्यात असा चिमटा त्यांनी विरोधकांना काढला आहे.
विरोधकांनी केवळ टीका न करता सरकारच्या चांगल्या योजनांचे कौतुक करावे. सशक्त विरोधी पक्ष म्हणून त्यांनी काम करावं. स्वत: काही करायचं नाही आणि आम्ही केलेल्या चांगल्या गोष्टीवर टीका करायची अशी भूमिका विरोधी पक्षाची असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.