सटाणा : बहुजननामा ऑनलाईन – युती सरकारच्या काळात सर्वात जास्त आत्महत्या झाल्याची आकडेवारी चर्चेत असतानाच शेतकऱ्यांविषयी आणखी एक घटना समोर आली आहे. सात महिने उलटूनही संबंधित व्यापाऱ्यांकडून चेक बाउंसचे कांदा पेमेंट न मिळाल्याने संतप्त झालेल्या जवळपास ७० ते ८० शेतकऱ्यांनी काल (सोमवार) बाजार समितीच्या मध्यवर्ती कार्यालयाला टाळे ठोकून चार तास अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवले. झालेल्या घटनेनंतर शेतकरी आणि व्यापारी यांच्यात सकारात्मक चर्चा घडवून आणत पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी नव्वद दिवसांत पेमेंट अदा करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.
सटाणा येथील बाजार समितीतील गजानन ट्रेडिंग कंपनीचे संचालक आणि इतर अनेक व्यापारी वर्गांनी गेल्या वर्षभरात शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी केला होता. दरम्यानच्या काळात काही शेतकऱ्यांचे कांदा पेमेंट अदा करण्यात आले मात्र सात महिने उलटूनही चेक बाउंसचे कांदा पेमेंट न मिळाल्याने संबधित व्यापाऱ्यांची भेट घेऊन पैशांची मागणी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी एकच गोंधळ घालून मुख्य प्रवेशद्वाराला टाळे ठोकत अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवले. तसेच कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनही केले.
सटाणा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी व्यापारी आणि शेतकरी, यांच्यात सकारात्मक चर्चा घडवून आणत पोलीस अधिकाऱ्यांसमोर स्टॅम्प पेपरवर नव्वद दिवसांच्या मुदतीत पेमेंट अदा करण्याचे लेखी आश्वासन संबधित व्यापाऱ्याने दिले आहे. येत्या नव्वद दिवसांत पेमेंट अदा न केल्यास शेतकरी न्यायालयात जाण्याचा मार्ग अवलंबतील.