बहुजननामा ऑनलाइन टीम – केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यावरून गेल्या काही दिवसापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन(Farmers agitation) सुरु आहे. आंदोलक आणि सरकारमध्ये चर्चा झाली पण त्यातून काही तोडगा निघाला नाही. आंदोलक हे कायदे रद्द करण्यावर ठाम आहेत. या आंदोलनाला सर्वच स्तरातून पाठींबा मिळत आहे. आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही. आता तर या आंदोलकांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजपा विरुद्ध भाजपाविरोधक अशा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. सत्ताधारी नेते या आंदोलनासाठी विरोधी पक्षांना जबाबदार धरत आहेत, तर विरोधी पक्षातील नेतेमंडळी कायदे मागे घेण्याच्या शेतकऱ्यांच्या मागणीला पाठिंबा देताना दिसत आहेत. भाजपा नेत्या बबिता फोगाटने शेतकरी आंदोलन हे तुकडे तुकडे गँगने हायजॅक केल्याचं ट्विट केलं होतं. यावरुनच आता ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी फोगट यांच्या ट्विटचा खरपूस समाचार घेतलाच पण त्याचबरोबर मोदी कोणाची चौकीदारी करतात अदानी-अंबानींची की शेतकऱ्यांची?”, असा टोला प्रशांत यांनी ट्विटमधून लगावला आहे.
प्रशांत भूषण यांनी ट्विटरवरुन अदानी आणि अंबानींच्या तुकड्यांवर जगाणारे लोकं आज आपल्या शेतकऱ्यांना तुकडे तुकडे गँग म्हणत आहे अशा शब्दात शेतकरी आंदोलनाला आणि त्याला पाठिंबा देणाऱ्यांना तुकडे-तुकडे गँग म्हणणाऱ्या बबिता फोगट यांचा समाचार घेतला’
तर दुसऱ्या ट्विटमधून प्रशांत भूषण यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. “आता मोदी चौकीदार आहेत हे मान्यच करावं लागेल. प्रश्न फक्त इतका आहे की ते चौकीदारी कोणाची करतात. अदानी-अंबानींची की शेतकऱ्यांची?”, असा टोला प्रशांत यांनी ट्विटमधून लगावला आहे.
बबिता नक्की काय म्हणाली होती?
ऑगस्ट २०१९मध्ये भाजपमध्ये प्रवेश केलेल्या बबिता फोगाट ही विविध राजकीय मुद्द्यांवर सातत्याने मतप्रदर्शन करताना दिसली आहे. शेतकरी आंदोलनाबाबतही बबिता फोगाटने ट्विट केलं होत त्यामध्ये “आता असं वाटू लागलंय की शेतकरी आंदोलन हे तुकडे तुकडे गँगने हायजॅक केलं आहे. मी सगळ्या शेतकरी बांधवांना हाथ जोडून विनंती करते की त्यांनी कृपया आपापल्या घरी परत जावं. पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीही शेतकऱ्यांचे हक्क डावलणार नाहीत. काँग्रेस आणि डाव्या पक्षांतील नेतेमंडळी कधीही शेतकऱ्यांचं भलं करू शकत नाहीत”, असे तिने म्हंटले होते.
भाजपच खरी तुकडे तुकडे गँग; बादल यांचा पलटवार
तुकडे तुकडे गँगच्या वक्तव्यावरुन शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनीही याच भाजपावर निशाणा साधला. भाजपाच देशातील खरी तुकडे तुकडे गँग आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. तसंच शेतकरी आंदोलादरम्यान देशाला तोडण्याचं काम त्यांनी केलं असल्याचंही बादल म्हणाले आहेत. भाजपानं राष्ट्रीय एकतेला तुकड्यांमध्ये तोडलं आहे. त्यांनी हिंदूंना मुस्लीमांविरोधात भडकावलं आहे. आता ते शिख बांधवांबद्दलही तसंच करत आहेत. देशभक्ती असलेल्या पंजाबला भाजप सांप्रदायिकतेच्या आगीत ढकलत आहे, असंही बादल यांनी म्हंटल आहे.
ज्यांनी नवा कायदा तयार केला त्यांनी आयुष्यात कधी शेती केली नाही. केंद्रातील मोदी सरकार हे अधिकाऱ्यांच्या इशाऱ्यावर चालत आहे. आपण जय जवान जय किसान असं म्हणतो. आज जवानही आंदोलनात सहभागी झाले आहेत त्यामुळे भाजपनं आपल्या अहंकारातून मागे हटून शेतकऱ्यांशी चर्चा केली पाहिजे. असेही बादल म्हणाले.
ज्यांनी नवा कायदा तयार केला त्यांनी आयुष्यात कधी शेती केली नाही. केंद्रातील मोदी सरकार हे अधिकाऱ्यांच्या इशाऱ्यावर चालत आहे. आपण जय जवान जय किसान असं म्हणतो. आज जवानही आंदोलनात सहभागी झाले आहेत त्यामुळे भाजपनं आपल्या अहंकारातून मागे हटून शेतकऱ्यांशी चर्चा केली पाहिजे. असेही बादल म्हणाले.