नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत दुष्काळ तीव्र असताना फडणवीस सरकार हे विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळत आहे. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या वाळलेल्या बागेचे आठ दिवसात तातडीने पंचनामे करून संत्रा बागेला एक लाख रुपये तसेच टँकरने पाणी घालून जगविलेल्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यास एकरी ५० हजार रूपये तातडीची मदत करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली. या मागण्या मान्य न केल्यास मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा नेण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे विदर्भातील दुष्काळी दौऱ्यावर आले होते त्यावेळी ते बोलत होते. जलयुक्त शिवार योजनेने काहीही काम झालेले नाही या योजना फसव्या योजना असल्याचेही ते बोलले. येत्या आठ दिवसात विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या वाळलेल्या बागेचे तातडीने पंचनामे करावे व वाळलेल्या संत्रा बागेला एक लाख रुपये तसेच टँकरने पाणी घालून जगविलेल्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यास एकरी ५० हजार रूपये तातडीची मदत करावी या मागण्या परिषदेत सर्वानुमते करण्यात आल्या.
दरम्यान, लोकसभेत मिळालेल्या विजयाच्या धुंदीत राज्यकर्त्यांना दुष्काळग्रस्तांकडे बघण्यासाठी वेळ नाही. दुष्काळी मदतीसाठीचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. या दबावाला शेतकरी संघटना बळी पडणार नाही. शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.