मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मागील पाच वर्षात युती सरकारच्या काळात शेतकऱ्यांनी सर्वात जास्त आत्महत्या केल्या तसेच पाच वर्षपासून राज्यातील शेतकरी दारिद्र्यात खितपत पडले आहेत. शेतकऱ्यांसमोर आज अनेक प्रश्न उभे आहेत आणि त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. अशा अनेक शेतकरी प्रश्नावर उद्धव ठाकरे कधीच कडक शब्दात बोललेले दिसले नाही. मग विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच शेतकऱ्यांचा पुळका कसा आला ? असा खोचक सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शिवसेनेला केला आहे.
राजू शेट्टी यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये ते म्हणतात गेल्या चार वर्षातच बारा हजार शेतकऱ्यांनी शेतीच्या नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्या आहे. शेतकऱ्यांच्या कोणत्याही शेतीमालाला भाव मिळालेला नाही. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून १७ जून २०१७ रोजी राज्य शासनाने कर्जमाफी केली मात्र अद्यापही राज्यातील सुमारे ३० लाख पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही. ३४ हजार कोटी माफ केली असताना केवळ १९ हजार कोटींची कर्जमाफी झालेली आहे. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आत्ताच तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कसे काय बोलू लागला आहात असा खोचक सवाल राजू शेट्टी यांनी केला आहे.
दरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून तुम्हाला जबाबदारी टाळता येणार नाही. तुम्हीही या सरकारचे भागीदार आहात हे उभ्या महाराष्ट्रातील शेतकरी जाणतो आहे असंही राजू शेट्टींनी सांगितले.
काय केले आरोप :-
* निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांचा पुळका कसा ?
* ४ वर्षातच बारा हजार शेतकऱ्यांनी शेतीच्या नापिकीला कंटाळून आत्महत्या.
* ३० लाख पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी अजूनही नाही.
* ३४ हजार कोटी माफी केली असताना केवळ १९ हजार कोटींची कर्जमाफी.
* पिकविम्यात कार्पोरेट कंपन्यानी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट केली.
* जनावरांना चारा नाही मात्र चारा छावण्यात घोटाळे होत आहेत.
* निवडणुकीच्या तोंडावर “पहिले मंदिर फिर सरकार,सत्तेत जागा वाटप झाल्यावर “पहले सरकार फिर मंदिर”.
https://www.facebook.com/plugins/post.php?href=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2Frajushetti7227%2Fposts%2F2352817764805721&width=500