बहुजननामा ऑनलाइन – राज्यात एकीकडे कोरोनामुळे अनेकांच्या नोकर्या गेल्या आहेत. त्यामुळे रोजगार बुडाला आहे. अशातच मुसळधार झालेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान पाहून भादली येथील शेतकर्याने घरात गळफास घेतल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. प्रभाकर पांडूरंग कोळी (57) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.
कोळी यांनी शेतात उडीद, कापसाची लागवड केली होती. काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले होते. मुसळधार पावसाआधी त्यांनी उडिदाची कापणी केली होती. परंतु, पावसामुळे त्याचेही नुकसान झाले. त्यामुळे घरी कोणीही नसल्याचे पाहून कोळी यांनी दोरीने गळफास घेतला. सायंकाळी पत्नी आणि मुलगा घरी आल्यावर घराचा दरवाजा आतून बंद असलेला दिसला. त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता प्रभाकर गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आले. त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्यांनी मृत घोषित केले.