जालना : बहुजननामा ऑनलाइन – शेतकरी कुटुंबाला जबर मारहाण करून जिवंत जमिनीत पुरण्याचा प्रयत्न केल्याच्या गंभीर आरोपाखाली भाजप किसान मोर्च्याचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब भवर यांना अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
सोमवारी जालन्यात एकीकडे भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक सुरू असताना रावसाहेव भवर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खांडेभराड कुटुंबीय आणि इतर दोन महिलांना मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप होता. याप्रकरणी पोलिसांनी भवर याला रात्री उशीरा अटक केली.
पुरवणी जबाबात त्याच्यावर अॅट्रोसिटी कायद्याची कलमवाढ ही करण्यात आली आहे. दरम्यान, भवर यांना आज जालना न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
भाजपचे किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष रावसाहेब भवर यांनी निवडुंगा येथील शेतकरी ज्ञानेश्वर खांडेभराड यांच्या शेतात विहिरी खोदण्यासाठी जेसीबी मशीन आणला होता. आपल्या शेतात अचानकपणे जेसीबी मशीन आणल्यामुळे या कुटुंबाने त्यांना विरोध केला. त्यामुळे भवर आणि त्यांच्या समर्थकांनी या कुटुंबाला जबर मारहाण केली होती. भवर यांनी खांडेभराड यांच्या कुटुंबातील महिलांना देखील मारहाण केली होती. या घटनेनंतर खांडेभराड कुटुंबांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली होती.