बहुजननामा ऑनलाईन
मुंबईतील दादर येथील इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येणार आहे. या जागेवर आज (शुक्रवार दि 18 सप्टेंबर) दुपारी 3 वाजता बाबासाहेबांच्या पुतळ्याची पायाभरणी करण्यात येणार होती. परंतु हा पायाभरणी समारंभ अचानक पुढे ढकलण्यात आला. यानंतर अनेक तर्कवितर्क लावले जात होते. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
अनेक मंत्र्यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण पोहोचलं नव्हतं. तर अनेकांना या कार्यक्रमाची माहिती देखील नव्हती. याशिवाय जे मंत्री उपस्थित राहणार होते त्यांनाही अगदी कमी कालावधीत या कार्यक्रमाची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली होती. यामुळं अनेक मंत्री नाराज होते. याची दखल घेत आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा कार्यक्रम पुढे ढकलण्याचे निर्देश दिले आहेत. आता नवीन तारीख निश्चित करून पूर्ण नियोजनाअंती हा कार्यक्रम होणार आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, “इंदू मिल येथे महामानव डॉ बाबासाहेबांचे भव्य स्मारक उभे करण्याची सर्वांची इच्छा आहे. यात कुठलाही पक्ष-संघटना असा भेदभाव असू शकत नाही. सर्वांच्या सहभागानं पुढील काही दिवसात हा पायाभरणी समारंभ होणार आहे. यात कुणीही राजकारण करू नये” असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “राज्य मंत्रिमंडळाच्या नर्णयानंतर एमएमआरडीएनं पुतळ्याच्या सुधारीत संरचनेच्या दृष्टीनं सर्व तयारी पूर्ण केली आणि त्यानुसार पायाभरणी कार्यक्रम करण्याचं नियोजन केलं होतं. परंतु अशा महत्त्वपूर्ण कार्यक्रमात सर्वांचा सहभाग असणं गरजेचं आहे हे मी लक्षात आणून दिलं आहे आणि त्यामुळंच ठरवल्याप्रमाणे एक चांगला कार्यक्रम सर्व आवश्यक मान्यवरांना निमंत्रित करून पुढील काही दिवसात करा असे निर्देश मी दिले आहेत” असंही सीएम ठाकरेंनी यावेळी नमूद केलं आहे.