पुणे : बहुजननामा ऑनलाईन – भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण आणि अर्बन नक्षलवाद्यांशी संबंध असल्याप्रकरणी तुरुंगात असलेले प्रा. वरवरा राव यांना पुणे न्यायालयाने अंतरिम जामीन देण्यास नकार दिला. मेहुणीच्या अंत्यविधीसाठी जामीन द्यावा, असा अर्ज वरवरा राव यांच्यावतीने न्यायालयात करण्यात आला होता.
पुण्यातील शनिवारवाडा येथील आयोजित एल्गार परिषदेच्या प्रकरणावरून पोलीस ठाण्यामध्ये बेकायदेशीर प्रतिबंधक हालचाली कायदा आणि विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी पुणे पोलिसांनी कवी प्रा. वरवरा राव, अॅड. सुधा भारद्वाज, अॅड. अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस आणि गौतम नवलाखा या पाच जणांना अटक केली होती.
प्रा. वरवरा राव हे सध्या एल्गार प्रकरणी येरवडा तुरुंगात आहेत त्यांनी गेल्या आठवड्यात पुणे न्यायालयात अंतरिम जामीनासाठी अर्ज केला होता. मेहुणीचे निधन झाले असून तिच्या अंत्यविधीत सहभागी व्हायचे आहे, असे कारण वरवरा यांच्या वतीने देण्यात आले होते.परंतु जामीन मिळाल्यास वरवरा राव फरार होऊ शकतात, त्यामुळे त्यांना जामीन देऊ नये, असा युक्तिवाद सरकारी वकिलांच्या वतीने करण्यात आला होता. तर २२ एप्रिल रोजी मेहुणीचे निधन झाले असून २९ एप्रिल ते ४ मे कालावधीत अंत्यविधी होणार आहेत. यासाठी हैदराबादला जायचे आहे. न्यायालयाने अंतरिम जामीन द्यावा, असे अर्जात म्हटले होते. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने राव यांना अंतरिम जामीन देण्यास नकार दिला.