पुणे : बहुजननामा ऑनलाईन – भारतीय लोकशाहीतील मूल्ये आपण जोपासली पाहिजे जसे कि स्त्री-पुरुष समानता, सर्वधर्म समभाव, बंधुभाव हे सर्व हक्क जनतेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या घटनेने दिले आहेत. मात्र, केंद्रातील मोदी सरकार ही घटनाच बदलण्याचे षड्यंत्र करत आहे. त्यामुळे भाजप पुन्हा सत्तेवर आल्यास पुन्हा निवडणुका होणार नाहीत, अशी भीती नगरसेवक अविनाश बागवे यांनी व्यक्त केली.
पुणे लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ बोपोडी, औंध भागात प्रचार यात्रा घेण्यात आली. या प्रचार यात्रेचा समारोप कस्तुरबा इंदिरा वसाहत येथे झाला. त्यावेळी बागवे बोलत होते. प्रचार यात्रेला मानाजी बाग बोपोडी येथून प्रारंभ झाला. कस्तुरबा इंदिरा वसाहत येथे समारोप झाला. औंध गाव चौकात माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, संगीता गायकवाड, कैलास गायकवाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले. या प्रचार यात्रेत आमदार अनंतराव गाडगीळ, दीप्ती चौधरी , मनीष आनंद, श्रीकांत पाटील, आनंद छाजेड, वीरेंद्र किराड, शलाका पाटील, शांताराम कुंजीर, शैलेजा खेडेकर आदी सहभागी झाले होते.
बागवे म्हणाले, भाजपचा हा डाव उलथून लावण्यासाठी कॉंग्रेस सत्तेवर येण्याची गरज असून पुणे लोकसभा मतदार संघाचे कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांचे उमेदवार मोहन जोशी यांना निवडून आणणे हे आपले कर्तव्य आहे, असे आवाहन त्यांनी जनतेला केले.