नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रक्षोभक वक्तव्य केल्याने निवडणूक आयोगाने अनुराग ठाकुर आणि प्रवेश वर्मा यांच्यावर कारवाई केली आहे. निवडणूक आयोगाने केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकुर यांच्यावर प्रचारासाठी 72 तास आणि प्रवेश वर्मा यांच्यावर 96 तासांची बंदी घातली आहे. प्रवेश वर्मा हे पश्चिम दिल्लीचे खासदार आहेत.
यापूर्वी प्रचारादरम्यान कथित वादग्रस्त वक्तव्य प्रकरणात निवडणूक अयोगाने बुधवारी अनुराग ठाकुर आणि प्रवेश साहब सिंह वर्मा यांचे नाव भाजपाच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून काढण्याचे आदेश दिले होते. निवडणूक अयोगाने दोन्ही नेत्यांवर द्वेषपूर्ण भाषणावरून नोटीस जारी करून गुरूवारी दुपारी आपली बाजू मांडण्यास सांगितले होते.
अनुराग ठाकुर आणि प्रवेश वर्मा यांनी काय म्हटले?
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपा सतत शाहीन बागचा मुद्दा उचलून धरत आहे. प्रचारादरम्यान, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी एका सभेत घोषणाबाजी केली होती. त्यांनी सीएएविरूद्ध आंदोलन करणार्या लोकांना देशाचे गद्दार म्हटले होते. अनुराग ठाकुर यांनी आपल्या भाषणात घोषणा दिली होती की, देश के गद्दारों को…गोली मारो…
हे वक्तव्य निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन करणारे – आयोग
प्रवेश वर्मा यांना जारी केलेल्या नोटीसमध्ये आयोगाने म्हटले आहे की, या प्रकरणात दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकार्यांच्या (सीईओ) अहवालाच्या आधारे कारवाई करण्यात आली आहे. वर्मा यांनी मुलाखतीमध्ये सीएएविरूद्ध शाहीन बागमधील आंदोलनकर्त्यांबाबत प्रक्षोभक वक्तव्य केले होते.
याशिवाय आयोगाने विकासपुरी विधानसभा मतदारसंघात वर्माने एका सभेत केलेल्या भाषणातही शाहीनबाग आंदोलनकर्त्यांबाबत प्रक्षोभक वक्तव्य केल्याचे म्हटले आहे. हा निवडणूक आचारसंहितेचा भंग आहे, असे आयोगाने म्हटले आहे. दिल्ली सीईओ कार्यालयाने आयोगाला पाठवलेल्या रिपोर्टमध्ये ठाकूर आणि वर्मा यांनी दिल्ली निवडणुकीदरम्यान वादग्रस्त आणि प्रक्षोभक वक्तव्याला दुजोरा दिला होता. यानंतर गुरूवारी निवडणूक आयोगाने या दोघांविरूद्ध कारवाई केली आहे.