Eknath Shinde On Badlapur School Girl Incident | बदलापूर प्रकरणावरून मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, बाहेरून लोकं आणली, आंदोलन राजकीय प्रेरित…”

August 21, 2024

मुंबई: Eknath Shinde On Badlapur School Girl Incident | बदलापूरमध्ये एका शाळेत सफाई काम करणाऱ्या कामगारानं दोन चिमुरड्या मुलींचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना घडली. चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणानं अख्खा महाराष्ट्र हादरला. त्यानंतर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी बदलापूरमध्ये पाहायला मिळाली.

शहरातील काही राजकीय पक्ष आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी (दि.२०) बदलापूर बंदची हाक देत आंदोलनाच करणार असल्याचे सांगितले. त्याला प्रतिसाद देत सकाळी सहा वाजल्यापासून सदर शाळेबाहेर पालकांनी निदर्शने केली. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली.

त्यानंतर आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी करत साडे अकराच्या सुमारास आक्रमक आंदोलकांनी शाळेत प्रवेश करत तोडफोड केली. त्याचवेळेस काही आंदोलक रेल्वे स्थानकाकडे गेले व त्यांनी रुळांवर ठिय्या मांडला. दरम्यान बदलापूर रेल्वे सेवा संपूर्ण ठप्प झाली होती.

या प्रकरणाने राज्यातील वातावरण तापलेले असताना अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक धक्कादायक आरोप केला आहे. त्यांनी बदलापूर अत्याचार प्रकरणी भाष्य केले आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मी सरकारची भूमिका कालच स्पष्ट केली आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा करण्याचे मी निर्देश दिले आहेत.

तसेच हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जाणार असून ‘एसआयटी’ही नेमण्यात आली आहे. ज्या पोलिसांनी कामात दिरंगाई केली त्यांनाही निलंबित करण्यात आले आहे. पीडित कुटुंबाच्या मागे सरकार खंबीर उभे आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

तर दुसरीकडे या प्रकरणात लाखो रेल्वे प्रवाशांना त्रास झाला आहे. नऊ तास रेल्वे बंद होती. हे व्हायला नको होतं. यावरूनच कालचं आंदोलन हे राजकीय प्रेरित होतं, असा खळबळजनक दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. या आंदोलनात स्थानिक लोक कमी होते. मात्र बाहेरून गाड्या भरून लोकं आली होती.

त्यांच्या मागण्या मान्य केल्या होत्या. तरीही ते जायला तयार नव्हते. याचा अर्थ त्यांना सरकारला बदनाम करायचं होतं. तसेच एवढ्या वेळ रेल्वे रोखणं हे देशाचं नुकसान आहे. या घटनेचं राजकारणं चुकीचं आहे. हे राजकारण करणाऱ्याला लाज वाटली पाहीजे, असं मुख्यमंत्री यांनी सांगितले.

आंदोलनकर्त्यांनी लाडकी बहीण योजनेचे बॅनर आणले होते. असं बॅनर कोण आणतं? असे बॅनर लगेच तयार करून आंदोलनात आणले. त्यामुळे आता मला विरोधकांना एकच सांगणं आहे, लाडकी बहीण योजनेवरून तुम्हाला जी पोटदुखी झाली आहे ती या घटनेतून दिसून आली आहे, असेही शिंदे म्हणाले.

दरम्यान आता घडलेल्या घटनेविरोधात बदलापुरात जनक्षोभ सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असं वक्तव्य करणे कितपत योग्य आहे, यावर प्रश्नचिन्ह उभं राहात आहे. यावर विरोधक काय भूमिका घेतात हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे.