बहुजननामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे पक्षावर नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. त्यावर ‘एकनाथ खडसे हे भाजपचे जेष्ठ नेते आणि जुने-जाणते नेते आहेत. पक्षाने आजपर्यंत त्यांना भरभरुन दिल. त्यामुळे पक्षाचे नुकसान होईल अशी कोणत्याही प्रकारची भूमिका ते घेणार नाहीत,’ असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. मराठा समाजासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
उत्तर महाराष्ट्रातील भाजपचे अनेक नेते व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामध्ये खडसे यांचं नाव प्रमुख आहे. याबाबत चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता, खडसे असं काही करणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘नाथाभाऊंच्या बद्दल याआधी अनेकदा अशा चर्चा झाल्या. पण त्या अफवाच ठरल्या होत्या. आताची चर्चा सुद्धा अफवाच ठरेल,’ असे पाटील यांनी सांगितलं.
खडसेंनी फडणवीसांवर केली होती टीका
भाजपमध्ये आपल्याला सतत डावलण्यात येत असल्याची एकनाथ खडसेंची भावना आहे. त्यातून ते अस्वस्थ असून, खडसेंनी अनेक वेळा आपली नाराजी बोलून दाखवली आहे. पण गेल्या काही दिवसांपासून ते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडत आहेत. काल आलेले लोक आम्हाला अक्कल शिकवत आहेत, असा टोला त्यांनी मारला होता. ‘भाजपाची सत्ता जाण्यासाठी ‘मी पुन्हा येईन’ ही घोषणा जबाबदार आहे का याचा अभ्यास मी करतोय, असं सुद्धा ते म्हणाले होते. तसेच फडणवीस यांच्यावर टीका करुन खडसे पक्ष सोडण्याची तयारी करत असल्याचं बोललं जात आहे.
ठाकरे सरकारच्या निर्णयाचं पाटलांनी केलं स्वागत
‘मराठा समाजाला ओबीसी समाजास मिळणारे सर्व लाभ देण्यात यावे, अशी भाजपाची मागणी होती. त्या अनुषंगाने ठाकरे सरकारने मराठा समाजासाठी अनेक चांगले निर्णय जाहीर केले, त्याचे आम्ही स्वागत करतो. आता फक्त त्याची अंमलबजावणी व्यवस्थित करण्यात यावी. सरकारने दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेची जबाबदारी दोन मंत्र्यांनी घ्यावी आणि सर्वोच्च न्यायालयात पुन्हा धाव घेत आरक्षणासाठी प्रयत्न करावेत,’ असा सल्ला सुद्धा पाटील यांनी दिला.
‘मागास वर्गास सद्य परिस्थितीत १० टक्के आर्थिक सवलती देण्यात येतात, त्या सवलती मराठा समाजाला मिळाव्यात. पूर्ण झालेली प्रवेश प्रक्रिया स्थगित न ठेवता मराठा समाजाला त्यात सामील करुन घ्यावे. म्हणजे नव्याने प्रक्रिया करुन वेळ जाणार नाही. प्रवेश प्रक्रियेतील गोंधळ टाळण्यासाठी सरकारने काही नवीन निर्णय जाहीर करण्याची गरज असल्याची’ अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.