मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – ज्यांना आम्ही मोठं केलं त्यांच्याकडून आम्हाला छळाची अपेक्षा नव्हती, असं म्हणत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. पाच वर्षात गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक उभारु शकले नाहीत अशी टीका खडसे यांनी केली. गोपीनाथ गडावर एकनाथ खडसे म्हणाले की, भाजपाचं आजचं चित्र राज्यात उभं राहिलं ते जनतेला मान्य नाही. एवढंच नाही पंकजा मुंडे यांचा निवडणुकीतला पराभव ठरवून केला गेला आहे, असा आरोपही खडसे यांनी केला.
गोपीनाथ मुंडे यांनी पक्ष उभारणीसाठी आयुष्य वेचलं. त्यामुळेच तुम्ही, मंत्री झालात, मुख्यमंत्री झालात. मात्र त्याच गोपीनाथ मुंडे यांच्या मुलीला पाडण्याचं पाप तुमच्या डोक्यात कसं आलं?, असा घणाघात भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. आपोआप पक्ष सोडून गेलं पाहिजे ही नीती पक्षातल्या लोकांकडून राबवली जाते आहे ती योग्य नाही” असंही खडसे यांनी म्हटलं आहे. “छळायचं, मारायचं, दुर्लक्ष करायचं आणि मग म्हणायचं की गोपीनाथजी असते तर एकनाथ खडसेच मुख्यमंत्री झाले असते” याला काहीही अर्थ नाही. एकनाथ खडसे यांच्या भाषणाच्या रुपाने भाजपातली खदखद चव्हाट्यावर आली आहे.
पंकजा पक्ष सोडणार नाही… पण माझं सोडा. माझा भरोसा धरू नका, असा इशारा त्यांनी भाजपला दिला तसंच त्यांनी पक्ष सोडण्याचे संकेत देखील दिले. शेठजी-भटजीचा पक्ष म्हणून भाजपला हिणवले जात होते, मात्र त्या पक्षाला मोठे करण्याचे काम गोपीनाथ मुंडेंनी केलं. गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर संघर्ष केला मात्र त्यांनी कधीही पाठीत खंजीर खुपसला नाही. गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे यांनी शक्तीप्रदर्शन केलं. या निमित्त जो मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात एकनाथ खडसे बोलत होते.