पुणे : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस झाले असूनही राज्यात स्थिर सरकार स्थापन झालेले नाही. भाजपचा उपमुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव शिवसेनेने धुडकावून लावला आहे. शिवसेना मुख्यमंत्री पदाचा हट्ट धरून बसली आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झालेली दिसत आहे. शिवनेचा प्रस्ताव भाजपने मान्य न केल्यास शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा पाठिंबा घेत सरकार स्थापन करणार असल्याची चर्चा केली जात आहे. त्यातच आता माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेने इतर पक्षांसोबत जावे असे आवाहन केले आहे.
बी.जी. कोळसे पाटील यांनी फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट केला आहे. ते म्हणाले, ज्यावेळी नवीन सरकार येते त्यावेळी जुन्या बाटलीत नवीन पाणी असे म्हटले जाते. मात्र भाजपचे सरकार येते त्यावेळी जुन्या बाटलीत पाणी नसते तर त्यामध्ये विष असते. राज्यातील जनतेनेदेखील भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी इतर पक्षांना आदेश दिला आहे. शिवसेनेला पाठिंबा देऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री करा पण भाजपला पुन्हा सत्तेत आणू नका असे आवाहन त्यांनी इतर पक्षांना केले आहे.
कोळसे पाटील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावरही निशाणा साधला आहे. ते म्हणाले कि , सध्या सर्वांच्याच फाईल ईडीकडे आहेत. मोदी-शहा सर्वांनाच ब्लॅकमेल करतात. ईडीला घाबरु नका शरद पवार यांनी राज्याला दाखवून दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील पाच वर्षात उद्धव ठाकरे यांचा खूप अपमान केला आहे. शिवसेनेची अवहेलना केली आहे. एवढी अवहेलना आत्तापर्य़ंत कधीच झाली नव्हती. आता शिवसेनेची वेळ आली आहे. शिवसेना युद्धात जिंकली मात्र त्यांनी तहामध्ये हारता कामा नये. त्यांनी इतर पक्षांच्या साथीने सरकार स्थापन करावे. हीच ती वेळ असून जर शिवसेनेने आता योग्य निर्णय घेतला नाही तर त्यांना भविष्यात अशी संधी पुन्हा मिळणार नाही, असे कोळसे पाटील म्हणाले.
तसेच कोळसे पुढे म्हणले कि, सध्या राज्याला भाजप विरहीत सरकारची गरज आहे. जनसत्तेसमोर हिटलर देखील नतमस्तक झाला होता. जनसत्तेसमोर देवेंद्र फडणवीस हे झुरळ आहेत. ज्याप्रमाणे हिटलर नतमस्तक झाला त्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा देखील नमतील. त्यामुळे नवनिर्वाचीत आमदारांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत.