सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला मजबूत संविधान दिल्यामुळे देशाची प्रगती वेगाने झाली. राजकीय नेत्यांनी देखील मोलाचे योगदान दिले. त्यातूनच आर्थिक उन्नती झाली, असे प्रतिपादन इतिहास अभ्यास डॉ. विकास कदम यांनी व्यक्त केले. सात रस्ता, मोदीखाना येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयातील इतिहास व राज्यशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या ‘स्वातंत्र्यानंतरचा भारत’ या राष्ट्रीय चर्चासत्राचा समारोप करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे होते. व्यासपीठावर इतिहास संशोधिका डॉ. नभा काकडे, डॉ. राजेंद्रसिंह लोखंडे, डॉ. मल्लिनाथ अंजुनगीकर, प्रा. सुमन केंद्रे, प्रा. नामदेवराव गरड, प्रा. एम.एम. मस्के उपस्थित होते. डॉ. साळुंखे म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर देशाच्या राजकारणात नि:स्वार्थी नेत्यांची फळी कार्यान्वित झाल्यामुळे कृषी, सहकार, शिक्षण क्षेत्रात समाजाची प्रगती झाली. समाजाचा स्तर उंचावला. यावेळी राष्ट्रीय चर्चासत्रात डॉ. एस.जी. जाधव, डॉ. भीमराव अटकर, डॉ. महादेव आव्हाड, डॉ. शिवाजी वाघमोडे, डॉ. एस.पी. शिंदे, डॉ. घंटेवार, डॉ. गोवर्धन दिकोंडा, डॉ. टी.एन. शिंदे, डॉ. हनुमंत लोंढे, डॉ. सुशीलकुमार शिंदे, डॉ. संगमेश्वर नीला, डॉ. उमेश साळुंखे, डॉ. शीला स्वामी, डॉ. कांबळे, प्रा. शहाणे, डॉ. नभा काकडे आदिंनी शोधनिबंधाचे वाचन केले. प्रास्ताविक प्रा. दशरथ रसाळ यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. देवराव मुंडे यांनी केले. आभार प्रा. सुमन केंद्रे यांनी मानले.