वर्धा : बहुजननामा ऑनलाईन – विचारवंतांच्या हत्या, स्पर्धेतून बाद करणारे १३ पॉइंट रोस्टर व गुलाम करून ठेवलेल्या संविधानिक संस्था, प्रसार माध्यमे, निधी आयोग व लोकशाही व्यवस्थाच बाद करून टाकणारे इव्हीएमचे आजचे भिषण वास्तव पाहिल्यावर डॉ. आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून पाहिलेले समताधिष्टीत प्रबुद्ध भारताचे स्वप्न कधीचेच विरले आहे, अशी खंत प्रसिद्ध आंबेडकरी साहित्य विचारवंत व कवी डॉ. सागर जाधव यांनी व्यक्त केले.
येथील रमाई फाउंडेशन व सम्यक बुद्ध विहार प्रबुध्दनगरद्वारा आयोजित रमाबाई आंबेडकर यांच्या १२१ व्या जयंती निमित्त डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत भारत व आजचे वास्तव या विषयावरील व्याख्यानाकरिता प्रा. डॉ. सागर जाधव बोलत होते. डॉ. आनंदप्रकाश भेले, रमाई या एकपात्री नाट्यप्रयोगाच्या सादरकर्त्या सुषमा पाखरे, जिजाबाई राऊत यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. भारतातील प्राचीण काळापासून श्रमन संस्कृती विरुद्ध मनुवादी संस्कृती असा संघर्ष स्पष्ट करून प्रा. जाधव म्हणाले, भारतात राष्ट्र ही संकल्पना धर्म व विषमतेवर आधारीत असल्यामुळे सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व आध्यात्मिक विकास त्या वेगाने होऊ शकला नाही. भारतीय परंपरेप्रमाणे सांस्कृतिक तरकाला निशिध्द मानल्या गेले असल्याने आपल्या देशात स्टिफन हॉकिन्स आणि आईन स्टाईन होऊ शकले नाही असे सांगितले. अध्यक्षीय भाषणात भेले यांनी डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या भारताचे स्वप्न म्हणजे आदर्श लोकशाही देशाची निर्मिती अर्थात प्रबुद्ध भारताची स्थापना करण्याचे होते. आम्ही भारताचे लोक हिंदुस्थानाचे नव्हे आता स्वाभीमानी व क्रांतीकारी झालो पाहिजे. त्याशिवाय भारतीय नागरिकांना समाजवादी, धर्म निरपेक्ष, लोकशाही गणराज्य देवु शकणार नाही असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता अनेकांनी परिश्रम घेतले.