आमगाव : बहुजननामा ऑनलाइन – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विषमतेला नष्ट केले. या देशातील प्रत्येक व्यक्ती समान आहे त्यामुळे प्रत्येकाला समान संधी मिळाली पाहिजे असे त्यांना वाटत होते. त्यामुळे त्यांना संविधान लिहिण्याची संधी मिळताच संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी या देशातील प्रत्येक व्यक्तीला न्याय आणि सन्मान मिळवून दिला, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केले. येथील धम्मगिरी परिसरात लुंबिनी वन पर्यटन समितीच्या वतीने आयोजित आंतरराज्यीय बौद्ध धम्म संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
प्रमुख पाहुणे म्हणून खासदार मधुकर कुकडे, आमदार संजय पुराम, माजी आ. दिलीप बन्सोड, डॉ. मोहनलाल पाटील, माजी आ. रामरतनबापू राऊत, माजी म्हाडा सभापती नरेश माहेश्वरी, जिल्हा परिषद सभापती विश्वजीत डोंगरे, पं.स. सभापती वंदना बोरकर, उपसभापती दिलीप वाघमारे, जयप्रकाश शिवणकर, नागपूरचे नितीन गजभिये, जि.प.सदस्य सुरेश हर्षे, सुखराम फुंडे, प्राचार्य महेंद्र मेश्राम, पं.स. सदस्य छबू उके, रतन वासनिक, अॅड. एस.डी. बागडे, महेंद्र मडामे, उत्तम नंदेश्वर, समितीचे अध्यक्ष शिवचरण शिंगाडे, संस्थापक सचिव यादव मेश्राम उपस्थित होते. प्रास्ताविक यादव मेश्राम यांनी मांडले. संचालन रमण हुमे व राकेश रामटेके यांनी केले तर आभार जनार्दन शिंगाडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी समितीचे पदाधिकारी, भीम गर्जना संघटनेचे पदाधिकारी, भाजी विक्रेता संघाचे पदाधिकारी व समाजाच्या सर्व संघटना व समाज बांधवांनी सहकार्य केले.