मुंबई :वृत्तसंस्था – शिवाजी महाराजांबद्दलचे स्थान आमच्या मनात कायम आहे. शिवाजी महाराजांच्या वारसांच्या भांडणात आम्हाला पडायचे नाही. राजकीय पक्षांच्या भांडणातही आम्हाला पडायचे नाही, पॉलिटीकल स्कोर आम्हाला करायचा नाही, असे स्पष्ट मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे. सध्या राज्यात आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकावरुन मोठा वादंग सुरू आहे. छत्रपतींचे वंशज तसेच भाजपा नेते विरूद्ध शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात तू तू मै मै सुरू आहे. या वादावर बोलण्यास वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट नकार दिला. आम्हाला या वादात पडायचे नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, शिवाजी महाराजांना जाणता राजा ही पदवी लोकांनी दिलेली आहे. रयतेचा राजा म्हणून लोकांनी त्यांना मानलेले आहे, तेच आम्हाला महत्त्वाचे आहे. दरम्यान, छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे द्या, असे वक्तव्य करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानाला राष्ट्रवादी काँग्रेससचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनीही समर्थन दिले आहे. गादीचे वारस वेगळे आणि रक्ताचे वारस वेगळे, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. तसेच राज्यसभेचे तिकीट मिळावे, यासाठी उदयनराजे भोसले यांनी लोटांगण घातल्याचेही मलिक यांनी म्हटले आहे.
एका कार्यक्रमात खासदार संजय राऊत यांनी माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर जोरदार टीका केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सातारा, कोल्हापूरच्या गादीचा आम्ही आदरच करतो. महाराजांचे नाव जिथे येते, तिथे आम्ही नतमस्तकच होतो. पण शिवाजी महाराज ही कोणाचीही मक्तेदारी नाही. स्वत:ला छत्रपतींचे वंशज म्हणविणार्यांनी पुरावे द्यावेत, असे आव्हान शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले होते. त्यावरून राऊत यांना शिवेंद्रराजे यांनीही उत्तर दिले होते.
दरम्यान, संजय राऊत यांच्या वक्तव्याचे राजकारण करत भाजपाने शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. भाजपाचे आमदार राम कदम यांनी याप्रकरणी संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी घाटकोपर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. भाजपाने त्यांच्या कार्यालयात प्रकाशित केलेल्या आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकावरुन निर्माण झालेला वाद आता भाजपानेच पोलीस ठाण्यापर्यंत नेल्याचे दिसत आहे.