नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात गाढव हा प्राणी पूर्णपणे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. जर देशात लवकरच गाढवांच्या संख्येत वाढ झाली नाही तर अनेक राज्यांतून हा प्राणी पूर्णपणे ‘गायब’ होऊ शकतो. गाढवांची संख्या कमी होण्याचे कारण म्हणजे त्यांच्या मांसाला असणारी वाढती मागणी. सध्या गाढव हा प्राणी ‘फूड अॅनिमल’नुसार नोंदणीकृत नाही. म्हणून त्याला मारणे बेकायदेशीर आहे.
आंध्र प्रदेशात गाढवांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. या राज्यात गाढवांना मारून त्यांचे अवशेष कालव्यात फेकले जाते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचत आहे. बाजारात गाढवांचे मांस सुमारे 600 रुपये किलो या दराने विक्री केली जाते. तसेच मांस असणारे एक गाढव खरेदी करण्यासाठी 15 ते 20 हजार रुपये द्यावे लागत आहे. यामध्ये मांससाठी गाढवांची कत्तल केली जात आहे. त्यामुळे हे सर्व रोखण्यासाठी राज्य सरकारसमोर एक मोठे आव्हान बनले आहे.
गाढवाचे मांस खाण्यामागे अनेक कारणं
भारतात गाढवांचे मांस अनेक लोक खाण्यासाठी वापरतात. आंध्र प्रदेशात गाढवाच्या मांसावरून अनेक समज आहेत. इथल्या लोकांना वाटते, की गाढवाचे मांस अनेक समस्या दूर करू शकते. काहींना असेही वाटते, की गाढवाचे मांस खाल्ल्याने लैंगिक क्षमतेत वाढ होऊ शकते. याच कारणांमुळे लोक गाढवाच्या मांसचा वापर जेवण म्हणून करतात. आंध्र प्रदेशच्या पश्चिम गोदावरीसह अनेक जिल्ह्यात गाढवांची कत्तल केली जात आहे. कृष्णा, प्रकाशम आणि गुंटूरसह अनेक भागात गाढवाचे मांस मोठ्या प्रमाणात विकले जाते.