बहुजननामा ऑनलाइन टीम – सध्या राजकरणात जावई यांचा फॉर्मुला दिसत आहे कोणत्याही कारणाने जावई समोर दिसून येत आहे. ते ही राजकारणाच्याच बाबतीत घडत आहे. या जावई नावाच्या नात्याने राजकारणातील अनेक सासऱ्यांना गोत्यात आणणारी आहे. त्यामुळे कित्येकांची राजकीय कारकीर्द पणालाही लागल्याचं पहायला मिळतं. तसेच राजकारण संपुष्टात आल्याचंही पाहायला मिळतं.
मंत्री नवाब मलिक यांचे जावई
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना बुधवारी ड्रग्ज तस्कराशी आर्थिक व्यवहार केल्या प्रकरणी एनसीबीने अटक केली. आंतरराष्ट्रीय ड्रग तस्कर करण सजनानी आणि समीर खान यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचे पुरावे आढळल्याचा दावा एनसीबीने केला आहे. त्याच्या जावयाचे आंतरराष्ट्रीय तस्करांशी असलेले संबंध लक्षात घेता नवाब मलिक यांच्या डोक्याला मात्र ताप झाल्याचे दिसते. पण पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मात्र त्यांना क्लिन चिट दिलीय. त्यांच्या जावयाला अटक केली असली तरी स्वतः नबाब मलिक यांच्यावर व्यक्तिगत आरोप नसल्याचं त्यांनी म्हटलंय.
मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई
तसेच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे एका कारणामुळे चर्चेत असतात. ते म्हणजे त्यांचे जावई आणि कन्नड मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव. गेल्या लोकसभेवेळी औरंगाबाद मतदारसंघातून हर्षवर्धन जाधव पराभूत झाले आणि त्यानंतर त्यांचा आणि दानवेंच्या मध्ये एकमेंकावर टीका टिपणी होत असते. आपले सासरे आपल्याला वेडा ठरवण्याचा प्रयत्न करतात. रावसाहेब दानवे हे आपल्यापेक्षा दहापट वेडे असल्याची टीका त्यांनी केली होती. माझा मृत्यू झाला तर त्याला रावसाहेब दानवे जबाबदार असतील, असा आरोपही हर्षवर्धन जाधव यांनी केला होता. यावरुन असे दिसते कि, जावई हा आपल्या राशीतील दहावा ग्रह असल्याचा खरा अनुभव केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना आला असेल.
मनोहर जोशी यांचे जावई
मनोहर जोशींना मात्र आपल्या जावयामुळं थेट मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं. युती सरकारच्या काळात मनोहर जोशी यांचे जावई गिरीष व्यास यांच्या पुण्यातील जमीनीची मालकी आणि बांधकामावरुन वाद निर्माण झाला होता. एका मोक्याच्या भूखंडावरील शाळेचं आरक्षण उठवलं आणि त्या आरक्षणाचे हस्तांतर दुसऱ्याच एका जमीनीवर केलं गेलं. नंतर त्या मोक्याच्या भूखंडावर इमारत बांधण्यात आली. हे सर्व मनोहर जोशींचे जावई गिरीष व्यास यांनी केल्याची चर्चा त्यावेळी झाली होती. पदाचा दुरुपयोग करुन आपल्या जावयाला मदत केल्याचे आरोपही त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या मनोहर जोशी सरांवर झाले होते. जावयाच्या भूखंडाच्या कारणावरून त्यांना थेट मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
एकनाथ खडसे यांचे जावई
एकनाथ खडसे यांच्या गळ्यात कित्येक वर्षांनी मंत्रीपदची माळ पडली होती. पण सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एकनाथ खडसे यांचे जावई डॉक्टर प्रांजल खेलवलकर यांच्यावर आरोप केले. खडसेंच्या जावयाची लिमोझिन कार अवैध असल्याचा दावा दमानियांनी केला. तसेच डॉक्टर प्रांजल खेलवलकर यांची सोनाटा लिमोझिन ही अलिशान गाडी जप्त करा, अशी मागणीही त्यांनी केली होती. त्यानंतर जावयाच्या कारणावरून एकनाथ खडसेंच्यावर अनेक आरोप करण्यात आले. त्यामुळे पुढे जाऊन एकनाथ खडसेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई
राज्यातील जावयांनी सासऱ्यांना ताप दिलाआहेच, परंतु देशपातळीवरही ते दिसून येते. यात सर्वात पहिला क्रमांक लागतो तो काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांचा. व्यायामाची आणि कसदार शरीराची आवड असणाऱ्या रॉबर्ट वाड्रा यांच्या भूखंडांच्या खरेदी व्यवहारांची चर्चा राष्ट्रीय मीडियात वेळोवेळी होत असते. वाड्रा यांच्या हरयाणातील एका भूखंड खरेदी आणि विक्रीची चर्चा देशभर अजूनही चवीनं चघळली जाते. वाड्रा यांनी दिल्ली आणि आसपासच्या परिसरात जमीन आणि संपत्ती खरेदी केली आणि यासाठी रिअल इस्टेट कंपनी डीएलएफकडून पैसा देण्यात आला, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला होता. रॉबर्ट वाड्रा यांची 2019 साली ईडीकडून मनी लाँड्रिंग आणि परदेशात अवैध पद्धतीने संपत्ती खरेदी केल्याप्रकरणी चौकशी केली गेली. जयपूरमधील बिकानेर जिल्ह्यातील कथिक जमीन घोटाळ्याप्रकरणीही रॉबर्ट वाड्रा यांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर २०१९ मध्ये ईडीच्या चौकशीनंतर त्यांनी राजकारणात येण्याचे संकेत दिले होते. हा एक जावई असा की त्याच्या कर्तृत्वामुळे सगळा पक्षच अडचणीत येतोय
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे जावई
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची दत्तक मुलगी नमिता यांचे पती म्हणजे रंजन भट्टाचार्य. रंजन भट्टाचार्य हे वाजपेयी पंतप्रधान असताना ओएसडी (ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी) होते. सोबतच त्यांचा हॉटेलचा व्यवसायही होता. रंजन भट्टाचार्य हे वाजपेयींचे सल्लागार ब्रिजेश मिश्रा आणि सचिव एन के सिंग यांच्यानंतर तिसरे शक्तीशाली आणि महत्वपूर्ण व्यक्ती होते अशी दिल्लीच्या वर्तुळात चर्चा असायची. तसेच त्यांचा पीएमओच्या कामात मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप होत असल्याची चर्चा असायची.
मंत्री विजय शिवतारे यांचे जावई
बिहारमध्ये ‘सिंघम’ या नावावे प्रसिध्द असलेले आयपीएस शिवदीप लांडे हे राज्याचे माजी जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांचे जावई. बिहारमध्ये काम करत असताना शिवदीप लांडेनी आपल्या धडाकेबाज कारवायांनी अनेक गुंडांना घाम फोडला होता. आपल्या जावयामुळे विजय शिवतारे कधी गोत्यात आले नाहीत. पण शिवतारेंनी आपल्या पदाचा वापर करुन आपल्या जावायाला बिहारमधून थेट मुंबईत आणल्याची चर्चा अधून मधून होते.