मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – महिनाभर चाललेल्या राजकीय नाट्यानंतर अखेरीस महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्य सहा मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली होती. मात्र या आघाडीत मंत्रीपदावरून अद्याप एकमत झाले नाही. सरकारमधील तीन महत्त्वाच्या खात्यांवरून महाविकास आघाडीत तीव्र मतभेद निर्माण झाल्याची चर्चा आहे. खातेवाटपात समाधानकारक खाती न मिळाल्यास सरकारमधून बाहेर पडून सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे. २८ नोव्हेंबरला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
त्यांच्यासोबत शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, छगन भुजबळ, काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, नितिन राऊत यांनी मंत्रिपदांची शपथ घेतली. मात्र अद्याप या मंत्र्यांना पदभार देण्यात आलेला नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीमधील सर्वच नेत्यांकडून मंत्रीपदासाठी फिल्डींग लावण्यात येत आहे. यात कोणाला मंत्रीपद मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपदासह सर्वाधिक १६ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. फडणवीस यांच्याप्रमाणे उद्धव ठाकरेही दोन्ही महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासोबतच राष्ट्रवादी उपमुख्यमंत्रिपद कोणाला देणार, बंडखोरी करणाऱ्या अजित पवारांचं काय होणार, याकडेही राज्याचं लक्ष लागलं आहे.
Visit : bahujannama.com