पुणे : बहुजननामा ऑनलाईन – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी अतिशय जहरी टीका केली आहे. एकीकडे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना राणेंनी उजाळा दिला आणि त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्यावर प्रखर टीका केली. ते पुण्यातील सॅटर्डे क्लब येथे बोलत होते. यावेळी त्यांच्यासह खासदार गिरीश बापट, मोहन जोशी, घटनातज्ज्ञ उल्हास बापट, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्यासह अनेक अधिकारी आणि राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमात राणे म्हणाले, फडणवीस पाच वर्ष मुख्यमंत्रीपदी होते. ते अभ्यासू, सहनशील होते. कोणावर रागवले नाहीत. कधी उत्तर दिले नाही, असे नाही पण त्यांनी यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिलेल्या आदर्शाला साजेस काम केले आणि पत सावरली. आता उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा मान सन्मान ठेवावा. व्यक्ती म्हणून मला कधीही वाटले नव्हते की उद्धव मुख्यमंत्री होतील. मात्र, पदाचा मान ठेवावा लागतो.
उद्धव अनुभव शून्य व्यक्ती असल्याने राज्य अधोगतीकडे जाईल, अशी टीका राणे यांनी केली. मुंबईतील नाईट लाईफ योजनेबाबत ते म्हणाले, नाईट लाईफची मागणी कोणाचीच नाही, तो केवळ चिरंजीवाचा हट्ट आहे. हा बालहट्ट पुरविण्याऐवजी इतर प्रश्न सोडविण्यात त्यांनी लक्ष घालावे. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देताना नारायण राणे म्हणाले, शिवसेनेमध्ये मी 39 वर्षे होतो. याकाळात बाळासाहेबांच्या जवळ आलो. साहेब म्हणायचे की, नारायण मनाची श्रीमंती ठेवावी, एका म्यानात एकच तलवार राहू शकते, पैसा किंवा नावलौकिक. माझे गुरु बाळासाहेब ठाकरेच आहेत, असे राणे म्हणाले.
Visit : bahujannama.com