मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात 56 आमदार असलेल्या शिवसेनेचे मुख्यमंत्री, 54 आमदार असलेल्या राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री, 44 आमदार असलेल्या काँग्रेसचे मंत्री आणि सर्वाधिक 105 आमदार असलेला भाजपा विरोधी पक्षात ही लोकशाहीची ताकद आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी साऱ्यांना लोकशाहीची ताकद दाखवून दिली आणि भाजपा नेत्यांमधून आत्मविश्वास काढून घेतला. त्यामुळे पराभूत मानसिकतेने भाजपा पदवीधरची निवडणूक लढवत असल्याचा टोला राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे ( Social Justice and Special Assistance Minister Dhananjay Munde) यांनी भाजपला लगावला आहे.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ परभणी येथे आयोजित पदवीधर व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मुंडे म्हणाले की, भाजपाला धनंजय, जयसिंग यांच्यातील ‘जय’ आजकाल चालत नाही. त्यांना गोपीनाथ, एकनाथ यांच्यातील ‘नाथ’ ही चालले नाहीत. त्यामुळेच आता भाजपाला प्रत्येक निवडणुकीत धडा शिकवला पाहिजे, असेही ते म्हणाले. भाजपा आता पूर्वीसारखी उरली नाही. नव्याने आलेल्या नेत्यांनी मला राजकारण शिकवू नये. मी लवकरच माझ्या मूळ घरी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे भाजपाला नुकतीच सोडचिठ्ठी दिलेले माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी जाहीर केले.
मराठवाडा पदवीधरची निवडणूक लढण्याआधीच भाजपा पराभूत मानसिकतेत आहे. 35 उमेदवार रिंगणात असताना आपल्यातील बंडाळी शमवण्यापेक्षा भाजपा नेतृत्वांनी सतीश चव्हाण या नावाचे उमेदवार उभे करून आपली शक्ती क्षीण झाल्याचे सिद्ध केले आहे. अशा कृतीला सुशिक्षित मतदारांनी मतपेटीतून उत्तर द्यावे असे आवाहनही मुंडे यांनी केले आहे.