पुणे : बहुजननामा ऑनलाईन – अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे गेल्यानंतर नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपने कधीही आदित्य ठाकरेंचं नाव घेतलं नसल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिल आहे. ते पुण्यात कोव्हिड सेंटरच्या उदघाटन कार्यक्रमासाठी आले असताना प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधताना हे वक्तव्य केलं.
सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात भाजपने प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे आदित्य ठाकरेंच नाव घेतलं नाही. मात्र, सीबीआयकडे तपास गेल्यानंतर ४० दिवसांत जे खुलासे झाले नाहीत ते होत आहेत. मग सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करताना मुंबई पोलिसांवर कोणाचा दबाव होता? याचा तपास करायला हवा. तसेच हार्ड डिस्क नष्ट कुणी केल्या हे देखील समोर यायला हवे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
तसेच राज्यातील विशेषतः मुंबईतील कोरोना संसर्ग परिस्थिती समाधानाकरक नाही. मात्र, पुणे जिल्ह्यात चाचण्यांची संख्या जास्त असून, मुंबईत चाचण्यांची संख्या वाढली पाहिजे. देशातील ४० टक्के मृत्यू महाराष्ट्रात आहेत. राज्यातील कोरोना संसर्गित आणि मृत्यूचा असे दोन्ही दर कमी व्हायला पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत…
सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिलेल्या निकालानुसार, अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द न करता त्या घ्याव्याच लागतील. मात्र, त्याबाबतच्या तारखा ठरवण्याचे निर्देश प्रत्येक राज्यांना असतील, असे म्हटलं आहे. या निर्णयाचे देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान टळणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
सचिन सावंतांचा अभ्यास कमी पडतोय…
संदीप सिंह हे बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती जो सिनेमा झाला त्याचे निर्माते असून, एखाद्या कार्यक्रमात माझा त्यांच्यासोबत फोटो असेल, त्यावर राजकारण करण्यासारखं काही नाही. सचिन सावंत यांचा अभ्यास कमी पडत आहे, अशा शब्दांत फडणवीस यांनी सावंतांना टोला लगावला. सावंत यांना विधानपरिषदेवर जायचा आहे. त्यांना योग्य संधी मिळत नसल्याने ते निराश असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.