मुंबई: Devendra Fadnavis & Vinod Tawde Meets Amit Shah | मागच्या काही वर्षांपूर्वी भाजप नेते विनोद तावडे यांना महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा चेहरा म्हणून पाहिले जात होते. त्यांनी राज्यात महत्वाच्या खात्याचे मंत्रिपदही भूषवले होते. मात्र कालांतराने विनोद तावडे राज्याच्या राजकारणातून बाहेर पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. यासाठी भाजपाचे (BJP) अंतर्गत राजकारण नडले की अन्य काय? याबाबत तावडेच पुढील काही काळात सविस्तर सांगू शकतील.
मात्र पुढे तावडे देशपातळीवरील भाजपच्या निर्णयांमध्ये पाहायला मिळाले. भाजपच्या देशपातळीवरील महत्वाच्या कमिटीत विनोद तावडेंनी स्थान मिळवले. पक्ष संघटनेचे तावडे अनेक वर्षांपासून काम करीत होते हाच अनुभव यावेळी त्यांच्या कामी आला होता. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुती राज्यात ४५ पेक्षा अधिक जागा मिळवेल असा प्रचार करण्यात आला.
मात्र महायुतीला अवघ्या १७ जागांवर समाधान मानावे लागले. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पराभवाची जबाबदारी घेतली. महाराष्ट्रातील पराभवावर भाजपाचे दिल्लीत मंथन सुरू आहे.
याचपार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या आधी विनोद तावडे अमित शाहच्या भेटीला पोहचले आहेत. फडणवीस यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी चांगल्याच कानपिचक्या दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे या दोघांच्या भेटीने भाजपात मोठा भूकंप होणार अशी चर्चा आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदावरुन दूर होण्याची भूमिका घेतल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना दिल्लीला बोलावलं. त्यापूर्वीच भाजपा सरचिटणीस विनोद तावडे यांनी अमित शाह यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन महाराष्ट्रातील झालेल्या पराभवावर सविस्तर चर्चा केली. त्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
विशेष म्हणजे मागील काही काळापासून विनोद तावडे यांचं केंद्रातील वजन मोठ्या प्रमाणामध्ये वाढलंय. विनोद तावडे यांना केंद्रात मोठी जबाबदारी देण्यात आली होती. ती त्यांनी व्यवस्थितपणे पार पाडलीय. त्यामुळं विनोद तावडे यांच्यावर पक्ष श्रेष्ठींचा विश्वास दुणावला आहे. अशात महाराष्ट्रात झालेल्या पराभवानंतर भाजपामध्ये मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहेत.