मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – संबंध महाराष्ट्रात महाराष्ट्र दिन साजरा होत असताना नक्षलवादी हल्ला झाला त्यात आपले १६ जवान मृत्युमुखी पडले हा भ्याड हल्ला होण्यामागे सरकारचा नक्षलवादविरोधातील मवाळ भूमिकेचाच परिणाम असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खाते आहे पण तरीही नक्षलवादि हल्ले होत असतील तर त्यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही.आपल्या सैन्यदलातील १६ जवान मृत्युमुखी पडेपर्यंत गृहविभाग काय करत होता? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था हाताळण्यात फडणवीस अपयशी ठरले असून त्यांनी तत्काळ गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. तसेच शाहिद जवानांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदत द्यावी अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे . सध्या केंद्रात सत्तेत असलेले मोदी सरकार तसेच राज्यातील फडणवीस सरकार, दोन्हीही फक्त मोठ-मोठ्या गप्पा मारण्यातच पटाईत आहेत. या सरकारच्या काळात उरी, पुलवामा तसेच कालचा गडचिरोली येथील नक्षलवादि हल्ला असे हल्ले होत असताना भाजपावाले फक्त प्रचारसभेतच व्यस्त आहेत घरात घुसुन मारण्याच्या मोठ-मोठ्या फुशारक्या मारण्यात भाजपवाले पटाईत आहेत.
मोदी सरकारने २०१६ मध्ये नोटबंदी करत नक्षलवाद व दहशवादाचा बिमोड करू अशा वल्गना केल्या पण त्यांचा काही परिणाम झालेला दिसत नाही. भाजप सरकारची दहशतवादाविरोधात काही ठोस भूमिका नाही. त्यामुळेच या सरकारच्या काळात दहशतवाद्यांचे व नक्षलवाद्यांचे मनोधैर्य वाढले आहे, अशी टीका खासदार चव्हाण यांनी केली.गडचिरोली येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करुन त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात कॉंग्रेस पक्ष सहभागी आहे असे चव्हाण म्हणाले.