नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सिंचन घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं दिलेल्या क्लिन चीटला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप नोंदवला आहे. या संबंधित देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी एसीबीनं मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेलं प्रतिज्ञापत्र दिशाभूल करणारं असल्याचा दावा फडणवीसांनी केला.
सत्तर हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळा प्रकरणात एसीबीनं दाखल केलेलं प्रतिज्ञापत्र दिशाभूल करणारं असून न्यायालय ते स्वीकारणार नाही. एसीबीनं उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून अधिकाऱ्यांनी हा घोटाळा केल्याचं ध्वनित होतं. त्यामुळे या प्रतिज्ञापत्राला आमचा विरोध आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की एसीबीने आपल्या प्रतिज्ञापत्रात अधिकाऱ्यांनीच सर्व घोटाळा केल्याचे सांगितले आहे, परंतु सिंचन घोटाळ्यातील कागदपत्रांवर तत्कालीन मंत्र्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. असे असताना एसीबीने आज न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात अधिकाऱ्यांवर घोटाळ्याचे खापर फोडण्याचा प्रयत्न केला आहे. यातील कोणत्याही प्रकरणांशी अजित पवारांचा काहीही संबंध नसल्याचं एसीबीनं प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे. मात्र आणखी काही माहिती समोर आल्यास, तसंच जर न्यायालयानं त्याबाबत काही आदेश दिल्यास या प्रकरणाची पुन्हा चौकशी केली जाऊ शकते असं एसीबीनं म्हटलं आहे.
Visit : bahujannama.com