मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांचे पडसाद महाराष्ट्रातही उमटू लागले आहेत. या निवडणुकीत एनडीएला विजयाची चाहूल लागल्याने राज्यातील भाजपा नेते सध्या खुशीत आहेत. त्यांनी याचे श्रेय बिहार विधानसभा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा देण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही देवेंद्र फडणवीस यांचे एकीकडे अभिनंदन करत दुसरीकडे चिमटादेखील काढला आहे.
बिहार निवडणुकीत कोण बाजी मारणार याचे चित्र लवकरच स्पष्ट होईल. एनडीए कि महाआघाडी यापैकी कुणाचा विजय होणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मात्र, एनडीएचे पारडे जड असल्याने महाराष्ट्रातील नेत्यांनी फडणवीसांचे अभिनंदन करण्यास सुरूवात केली आहे. फडणवीस यांच्या रणनितीचे आणि नेतृत्वाचे हे यश असल्याचे भाजपाचे नेते आणि माजी आमदार प्रसाद लाड यांनी म्हटले आहे. तर देवेंद्र फडणवीसांनी अनुभावाच्या जोरावर बिहारमध्ये सुत्र हलवली, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
मात्र, राऊत यांनी फडणसवीसांचे अभिनंदन करतानाच टोलादेखील लगावला आहे. राऊत म्हणाले, जिंकले त्यांचे अभिनंदन करण्याची आमची परंपरा आहे. देवेंद्र फडणवीस हे विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाकडून बिहारचे प्रमुख होते, त्यांना महाराष्ट्राचा अनुभव दांगडा असल्याने त्यांनी येथे बसून बिहारमध्ये सुत्रं हलवली असतील. संपूर्ण केंद्रीय सत्ता तिथे कामाला लागली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही तेथे 17 ते 18 सभा घेतल्या होत्या.
राऊत यांनी भाजपावर निशाणा साधत म्हटले की, शब्द पाळला नाही, तर काय होते याचा अनुभव भाजपाने महाराष्ट्रात घेतलेला आहे. म्हणून बिहारमध्ये त्यांनी सावध भूमिका घेतली आहे. शिवसेनेला अगोदर मुख्यमंत्रिपदाचा शब्द देऊन नंतर ऐनवेळी मुख्यमंत्री पद देण्यास नकार दिला होता. भाजपाने आश्वासन न पाळल्याने शिवसेनेने पलटवार केला होता. आता ते बिहारमध्ये नितीश कुमार यांना दिलेला शब्द पाळत आहेत. म्हणून मुख्यमंत्री झाल्यावर नितीश कुमारांनी शिवसेनेचे आभार मानायला पाहिजेत.
तर बिहार निवडणुकीत विजय दृष्टीक्षेपात असताना प्रसाद लाड यांनी म्हटले की, बिहारमधील जनतेने भाजपवर, पंतप्रधान मोदींवर विश्वास दाखवला आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बिहार निवडणुकीची जबाबदारी उचलली. राष्ट्रीय पातळीवर त्यांनी नेतृत्व केल्याने फडणवीस यांचेही हे यश आहे. बिहारमध्ये एनडीए 130 च्या वर जाईल आणि महागठबंधन 100 च्या खाली जाईल, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.