मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून फडणवीस यांनी एका महत्त्वाच्या मुद्याकडे ठाकरे सरकारचे लक्ष वेधले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या कडक निर्बंधामुळे जनमानसात अस्वस्थता आहे. त्यामुळे तातडीने पावले उचून त्यांना दिलासा दिला जावा आणि नव्याने अधिसूचना काढावी, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
राज्यात कोरोनाचे संक्रमण वेगाने होत असल्याने राज्य सरकारने कोरोनाचे संक्रमण नियंत्रणात आणण्यासाठी मंगळवार (दि.5) पासून कडक निर्बंध आणि विकेंड लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाला काही ठिकाणी विरोध होताना पहायला मिळत आहे. तर पुणे आणि नागपूर मधील व्यावसायिकांनी रस्त्यावर येत आंदोलन केलं होतं. हाच मुद्दा उपस्थित करत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना तात्काळ भूमिका घेण्याचा सल्ला दिला आहे.
कोरोना काळात लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे जनमानसात असलेली अस्वस्थता आणि त्यामुळे तत्काळ पाऊले उचलून छोटे व्यवसायी, सामान्यांना दिलासा देण्याबाबत, तसेच सर्वच घटकांशी चर्चा करून पुन्हा नव्याने अधिसूचना जारी करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र.. pic.twitter.com/1U9LuvklhW
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 6, 2021
देवेंद्र फडणवीसांनी पत्रात काय म्हटले ?
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढतोय आणि त्यामुळे कठोर निर्बंध लावावे लागतील असा आपला दूरध्वनी मला आला होता. दोन दिवसांचा लॉकडाऊनचा विषय असल्याने आम्ही सहमती दर्शवली. मात्र, ज्याप्रकारे इतरही पाच दिवस लॉकडाऊन सदृश्य निर्बंध घालण्यात आलेत, त्यामुळे जनमानसात कमालीची अस्वस्थता आहे. काही ठिकाणी लोक रस्त्यावर उतरुन त्याचा विरोध करत आहेत.
निर्बंध घालताना विविध क्षेत्रांचा विचार अजिबात करण्यात आलेला नाही. अनेक घटकांना याचा फटका बसत आहे. ज्या प्रकारे निर्बंध प्रत्यक्षात लादण्यात आलेत, ते पाहता हा एकप्रकारे अघोषित लॉकडाऊनच आहे. त्यामुळे रिटेलर्स, छोटे दुकानदार, छोटे हॉटेल्स, केश कर्तनालय अशा सर्व घटकांचा विचार होणे आवश्यक आहे. अनेक बाबतीत संलग्नता पाहण्यात आलेली नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वाहतूक खुली ठेवताना गॅरेज आणि स्पेअर्स पार्टस दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत. असेच प्रकार इतर बाबतीत झाले आहेत.
त्यामुळे माझी विनंती आहे की, पुन्हा एकदा सर्व छोट्या-छोट्या घटकांशी चर्चा करुन त्यांना दिलासा देण्यात यावा. सर्वांना विश्वासात घेऊन, गरिबांचे जीवन आणि अर्थकारण दोन्हीही प्रभावित होणार नाही, अशा पद्धतीने नव्याने निर्बंधबाबतची अधिसूचना जारी करण्यात यावी. कोरोनाला रोखणे महत्त्वाचे आहेच. पण, कोरोना रोखताना अन्य मानवनिर्मित कारणांमुळे नागरिकांच्या जगण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल, अशीही कृती होता कामा नये. तात्काळ यासंदर्भात पाऊले उचलाल, असा विश्वास वाटतो, असे फडणवीस यांनी पत्रात म्हटले आहे.