मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या महिन्याभरापासून सुरु राजकीय नाट्य आहे. शनिवारी अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा देत सरकार स्थापन केलं. मात्र शपथविधीच्या ४ दिवसांनंतरच अजित पवार यांनी उप-मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला त्यानंतरच देवेंद्र फडणवीस यांनीही बहुमत नसल्याचे सांगत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे अजित पवार यांना मनधरणी करण्यात शरद पवार यांना यश आल्याच बोललं जात आहे.
शरद पवार यांनी राजीनामा दिल्याने बहुमत सिद्ध करता येणार नसल्याचे कारण देत फडणवीस सरकारनं मैदान सोडलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं २७ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजेपर्यंत बहुमत सिध्द करण्याची वेळ दिली होती. मात्र परिस्थिती बदल्याने फडणवीस सरकारला राजीनामा द्व्यावा लागला.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर नरेंद्र मोदींनी अमित शहा यांच्याशी तासभर चर्चा केली होती. जे. पी. नड्डा सुद्धा या बैठकीला उपस्थित होते. मोदी आणि शहा यांना ही परिस्थिती बदलता आली नाही. अजित पवारांना थांबवण्यात अपयश आल्यानंतर तोंडघशी पडण्याआधीच दिल्लीतून हा निर्णय घेण्यात आला, अशी चर्चा केली जात आहे.
भाजपच्या या पराभवावर काँग्रेसचे केसी वेणुगोपाल म्हणाले कि, “हा संविधानाचा आणि लोकशाहीचा विजय आहे. त्यांना वाटले होते घोडेबाजर करून सरकार स्थापन करतील. मात्र हा फक्त देवेंद्र फडणवीस यांचा पराभव नसून हा दिल्लीतील त्यांच्या नेतृत्वालाही चपराख आहे”, अशी खोचक टीका त्यांनी यावेळी केली.
महाविकासआघाडीनं काल आम्ही १६२ असे म्हणत शक्तिप्रदर्शन केले होते. त्यानंतर ४ दिवसांच्या फडणवीस सरकारनं राजीनामा दिल्यानंतर आता महाविकासआघाडीला राज्यपालांकडून सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले जाईल. त्यामुळं आता महाविकासआघाडी लवकरच आपले बहुमत सिध्द करेल, सोबतच महाविकासआघाडीकडून उध्दव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून निवड करण्यात आली आहे. तर, उप-मुख्यमंत्री म्हणून सध्या राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील आणि कॉंग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांच्या नावाची चर्चा आहे.