नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – जनतेचा माल खाण्यासाठी आणि भाजपला दूर ठेवण्यासाठी विश्वासघात आणि बेईमानी करून राज्यातील सरकार सत्तारूढ झाले आहे. पण जनादेशाच्या पाठीत खंजीर खुपसणारे सरकार फार काळ चालणार नाही, असे देशाचा इतिहास सांगतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमधील आमडीफाटा आणि धानला येथील सभांमध्ये बोलताना म्हणाले.शिवसेना अवकाळीग्रस्तांना २५ हजार रुपये हेक्टरी तर काँग्रेस-राष्ट्रवादी ५० हजार रुपये हेक्टरी देण्याची मागणी करत होते. पण आता मात्र शेतकऱ्यांना कोणतीही मदत देण्यास स्पष्ट नकार देत आहे.
राज्यात आपण काळजीवाहू मुख्यमंत्री असताना १०,००० कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी मंजूर केले असताना आज मात्र त्यांची फसवणूक होत आहे. आज पुन्हा नागपूर आणि परिसरात गारपीट झाल्यामुळे त्यांनाही मदत दिली पाहिजे. अवकाळीग्रस्तांना मदत मिळत नसून दुसरीकडे फसव्या जाहिरातीसारखी कर्जमाफी दिली जात आहे. आमच्या काळात २००१-२०१७ पासून कर्ज माफ केले गेले. पण यांच्या सरकारने फक्त दोन वर्षांचे कर्ज माफ केले. सप्टेंबर २०१९ ची अट देऊन अवकाळीग्रस्तांना मदतीपासून वंचित ठेऊन त्यात अटी-शर्ती लागू असे सांगून जीआर काढला. ही एका लबाड सरकारने केलेली मोठी लबाडी आहे, असेही फडणवीस त्यावेळी म्हणाले.
राज्यात मलईदार खात्यांसाठी भांडाभांडी होत असताना कृषी खात कोणाकडे असावे, यासाठी कोणीही आग्रही दिसून येत नाही. यातूनच त्यांचे शेतकरीप्रेम दिसून येत आहे. केंद्रातील मोदी सरकारने अनेक योजना आणल्या असून त्याचा देशाला लाभ होत आहे. शेतकरी सन्मान निधीसारख्या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा लाभ होत आहे. गेल्या काळात बरीच महत्वाची खाती विदर्भातील मंत्र्यांकडे होती. चंद्रशेखर बावनकुळे हे ऊर्जामंत्री असताना बिल भरले नाही म्हणून कोणत्याही शेतकऱ्याची वीज कापण्यात आली नाही. कायम शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आपल्या सरकारने काम केले, असेही फडणवीस म्हणाले.
Visit : bahujannama.com