मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे यंदा 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन अशी चर्चा सुरू होती. मात्र या दोन्ही वर्गाच्या महत्वाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यास बोर्ड अनुकूल नसल्याने ऑफलाईनच परीक्षा घेतली जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षांच्या तयारीचा आढावा शिक्षण विभागाने घेतला आहे.
सध्या तरी ठरलेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा घेण्याबाबत सोमवारी (दि. 22) झालेल्या बैठकीत चर्चा झाली आहे. ग्रामीण भागामध्ये ऑनलाईन परीक्षा घेण्यात अडचणी आहेत. कारण त्या भागात इंटरनेट कनेक्टीव्हीटी नसल्याने विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देऊ शकत नाहीत. त्यामुळे परीक्षा ऑफलाईनच घेण्याचा बोर्डाचा आग्रह आहे.
काही दिवसांपूर्वी राज्य मंडळाने दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 10 वी ची परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे दरम्यान होईल. बारावीची बोर्डाची परीक्षा 23 एप्रिल ते 20 मे दरम्यान होणार आहे. बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mahahsscboard.in या परीक्षेबाबतचे सविस्तर वेळापत्रक दिले आहे. दरम्यान राज्यात दहावीचे 16 लाख तर बारावीचे 14 लाख विद्यार्थी आहेत. त्यामुळे कोरोना काळात इतकी मोठी संख्या असलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा नेमकी कशी होणार, हा प्रश्न आहेच.