नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शिरोमणी अकाली दल (एसएडी) आणि भारतीय जनता पार्टी (भाजपा) यांनी दिल्लीतील युती तोडली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाबाबत कुठल्याही करारावर दोन्ही पक्ष पोहोचू शकले नाहीत. एसएडीने सध्या आपल्या चार उमेदवारांना अर्ज भरण्यास सांगितले आहे. पक्षाने असे म्हटले आहे की, ते अधिक जागा लढवू शकतात.
शिरोमणी अकाली दलाने आपल्या कार्यकर्त्यांना दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सांगितले आहे. राजौरी, कालकाजी, हरिनगर आणि शाहदरा या 4 जागांवरुन अकाली दलाने निवडणूक लढण्याची तयारी दर्शविली आहे. पक्ष आपल्या निवडणूक चिन्हावरुन निवडणूक लढवेल.
अकाली दलही या जागांवर निवडणूक लढवू शकतो
सदर बाजार, मोती नगर, पटेल नगर आणि कृष्णा नगर विधानसभा जागांवरही अकाली दलाचे लक्ष लागून आहे. सुरुवातीला जागांची संख्या वाढविण्याच्या दबावाचे राजकारण केल्यानंतर एसएडीने नंतर पाठपुरावा केला आणि २०१५ मधील जागावाटपाच्या फॉर्म्युल्याशी तडजोड करण्यास सज्ज झाला. पक्ष भाजपकडून 4 जागा मागत होता.
जेडीयूला भाजपने दिल्या 2 जागा
भाजप आणि जेडीयू युती करुन दिल्ली विधानसभा निवडणुका लढवतील. दिल्लीतील जेडीयू अध्यक्ष दयानंद राय यांनी सोमवारी सांगितले की ते दिल्लीत भाजप-जेडीयू आघाडीबरोबर निवडणूक लढवतील. भाजपाने जेडीयूला दोन जागा दिल्या आहेत. बुरूरी व संगम विहार विधानसभा मतदारसंघातून जेडीयूचे उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार एनडीए महायुतीच्या अंतर्गत एलजेपीला दिल्लीत जागा देऊ शकते. एलजेपीचा उमेदवार सीमापुरी मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतो. विशेष म्हणजे एलजेपीने यापूर्वी 15 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
भाजपने 57 उमेदवारांची पहिली यादी केली जाहीर
शुक्रवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 57 उमेदवारांची घोषणा केली. दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी सांगितले होते की यापैकी 11 अनुसूचित जातीतील असून 4 महिला आहेत. दिल्लीच्या ७० सदस्यीय विधानसभेसाठी ८ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून मतमोजणी ११ फेब्रुवारीला होणार आहे.