नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तिहार जेलमध्ये फाशीची वाट बघणार्या निर्भयाच्या चारही गुन्हेगारांना सध्या शेवटची इच्छा विचारली जात आहे. त्यांना शेवटची इच्छा विचारण्याची ही दुसरी वेळ आहे. निर्भयाचे गुन्हेगार मृत्यूच्या भितीने आपल्या शिल्लक राहिलेल्या लाईफ लाईन्सचा वापर करून कोर्टात जात आहेत, आणि आपला मृत्यू पुढे ढकलत आहेत. परंतु, या दरम्यान तिहार जेलच्या जेलरला त्यांना सारखी शेवटची इच्छा विचारावी लागत आहे. दोन वेळा शेवटची इच्छा या चौघांना विचारण्यात आली आहे, आता पुढे तिसर्यांदा आणि चौथ्यांदाही तिहारच्या जेलरला हे काम करावे लागू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे निर्भया केस शेवटच्या टप्प्यात खुपच अजब होत असल्याचे दिसत आहे.
8 जानेवारी 2020, तिहार जेल नंबर-3
निर्भयाचे गुन्हेगार मुकेश, पवन, विनय आणि अक्षय चौघेजण तिहारच्या जेल नंबर 3 च्या डेथ सेलमध्ये पोहचले होते. डेथ सेलमध्ये आणण्याचे कारण त्यांना माहिती होते. कारण 24 तास अगोदर म्हणजे सात जानेवारीला सायंकाळी चौघांनाही जेलरने त्यांच्या फाशीची तारीख सांगितली होती. डेथ वॉरंट निघाले होते. डेथ वॉरंटवर मृत्यूची तारीख होती 22 जानेवारी आणि वेळ सकाळी 7 वाजताची होती. डेथ वॉरंट जारी झाल्यानंतर 24 तासानंतर 8 जानेवारीला तिहार जेल तीन नंबरच्या जेलरने चौघांना त्यांच्या डेथ सेल मध्ये जाऊन वेगवेगळ्या पद्धतीने अधिकृतपणे त्यांची शेवटची इच्छा काय आहे, हे विचारले. तसेच कुणाला भेटायचे आहे का, कोणते अर्धवट काम पूर्ण करायचे आहे का, असे विचारले.
15 दिवसानंतर, 23 जानेवारी 2020
तिहार जेलचे तेच जेलर 15 दिवसांच्या आत पुन्हा एकदा त्यांना विचारत होते, तुमची शेवटची इच्छा काय आहे ? कोणा कोणाला भेटायचे आहे, कुठले अर्धवट काम पूर्ण करायचे आहे का ? जेल मॅन्युअल सांगते की, फाशीवर चढवण्यापूर्वी दोषीची शेवटची इच्छा विचारली पाहिजे. त्यास अर्धवट काम पूर्ण करण्यास संधी मिळाली पाहिजे. परंतु, कायद्याच्या चौकटीत राहून. परंतु, निर्भयाच्या या चार गुन्हेगारांची केस खुपच अजब झाली आहे. या चौघांना फाशीची शिक्षा झाली आहे. त्यांना आतापर्यंत दोन वेळा शेवटची इच्छा विचारण्यात आली आहे. अशीही शक्यता आहे की, आणखी तिसर्यांदा किंवा चौथ्यांदाही शेवटची इच्छा विचारली जाऊ शकते. यामुळे असे होऊ नये की, तेच म्हणावेत, सारखी सारखी शेवटची इच्छा विचारून सारखे सारखे मारण्यापेक्षा शेवटची इच्छा न विचारताच मारून टाका.
कायद्यातील पळवाटांमुळे तारीख वाढली
हे यामुळे झाले आहे की, आपल्या कायद्यात अनेक ठिकाणी पळवाटा आहेत. सात जानेवारीला जेव्हा पटीयाला हाऊस कोर्टाने प्रथम डेथ वॉरंट जारी केले होते, तेव्हा या चौघांची कोणतीही कायदेशिर याचिका न्यायालयात नव्हती. म्हणून न्यायालयाने त्यांची मृत्यूची तारीख आणि वेळ ठरवली होती. जेलरने सुद्धा चौघांची शेवटची इच्छा विचारली. पण त्यानंतर दुसर्या दिवशी यापैकी एक मुकेश क्यूरेटिव्ह पिटिशनसह सुप्रीम कोर्टात पोहोचला. नंतर सुप्रीम कोर्टातून दया याचिकेचा आधार घेत राष्ट्रपती भवनापर्यंत गेला. यामुळे पटीयाला हाऊस कोर्टाला आपणच जारी केलेले डेथ वारंट पुढे सरकवावे लागले आणि नवी तारीख काढली 1 फेब्रुवारी 2020.
जेलरने पुन्हा विचारली दोषींना शेवटची इच्छा
या नवीन तारखेसह तिहार जेलच्या जेलरला पुन्हा चौघांना शेवटची इच्छा विचारावी लागली. कारण तो जेल मॅन्युअलचा नियम आहे. जेलरने त्यांना शेवटची इच्छा विचारली. 23 जानेवारीला पुन्हा चौघांना शेवटची इच्छा विचारण्यात आली. यावेळीही जेलरने काही चूकीचे केले नाही. कायद्यानुसारच त्यांना इच्छा विचारली होती. सध्या जेलर असे समजून त्यांचे काम करत आहेत की 1 फेब्रुवारीला दोषींना फाशी होणार. परंतु, ही एक बाजू आहे. दुसरी बाजू अशी आहे, जेलरला तिसर्यांदा सुद्धा चौघांना शेवटची इच्छा विचारावी लागू शकते. कारण 1 फेब्रुवारीच्या अगोदर चारपैकी एक जण पुन्हा आपली शिल्लक असलेली ती लाईफ लाईन घेऊन न्यायालयात जाईल.
Visit : bahujannama.com