नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पत्नी आणि दोन चिमुकल्यांची हत्या करून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना राजधानी दिल्लीतील रोहिणी नॉर्थच्या नाहरपूर गावात घडली आहे. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. गुरुवारी (दि. 1) सकाळी ही घटना उघडकीस आली. मोठा मुलगा मूकबधीर तर छोटा मुलगा दिव्यांग होता. त्यात आईची मानसिक स्थिती ठिक नव्हती. या कारणामुळे पती-पत्नीमध्ये वाद होत असे. पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट सापडली असून यात पतीने जीवनात काहीच उरले नाही, तर भविष्यही अंधारात असल्याचे म्हटले आहे.
धीरज यादव (वय 29), पत्नी आरती यादव (वय 28), मुलगा हितेन (वय 6 वर्ष ) आणि अथर्व (3 वर्ष) अशी मृतांची नावे आहेत.
धीरजचे वडील महासिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे दोन्ही नातू दिव्यांग होते, छोट्या मुलाची आयुष्यभर सेवा करावी लागेल असे डॉक्टरांनी सांगितलं होते. त्यामुले धीरज चिंतेत होता. माझा मुलगा परिस्थितीचा सामना करू शकला नाही आणि आता सगळं काही संपल्याचे महासिंह म्हणाले. महासिंह लष्करातून निवृत्त झाले आहेत, त्यांनी दोन्ही नातवंडावर उपचारासाठी लाखो रुपये खर्च केल्याचे म्हटले आहे. परंतु लहान मुलगा ठिक होणार नसल्याची चिंता धीरजला सतावत होती, त्यामुळे दोघा नवरा-बायकोमध्ये भांडणं व्हायची.
डीसीपी प्रणव तायल यांनी सांगितले की, महासिंह यांचे कुटुंब रोहिणीच्या नाहरपूरमध्ये राहते. 3 मजली इमारतीत तळाला महासिंह आणि त्यांच्या पत्नी सुदेश राणी आणि आई राहत होती. त्यांचा मोठा मुलगा नीरज पत्नी आणि दोन मुलांसह पहिल्या मजल्यावर राहतात. दुसऱ्या मजल्यावर धीरजच कुटुंब राहत होते. तो कंत्राटी गाडी चालक होता. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडून आत गेले असता पत्नी आरतीचा मृतदेह रक्त्ताच्या थारोळ्यात पडला होता. तर हितेन आणि अथर्वही मृत अवस्थेत आढळले. धीरजचा मृतदेह पंख्याला लटकलेला होता. प्राथमिक अंदाजात धीरजने पत्नी आणि 2 मुलांची हत्या करून गळफास घेतल्याचा संशय आहे. रुममधून एक चाकूही जप्त केला आहे.